जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update News: राज्यात आज अनेक भागात तुफान पाऊस झाला आहे. अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटही झाली आहे. तर कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणत पावसानं शेती पिकांचे नुकसान केलं आहे. यातच आता हवामान विभागानं राज्यातील जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. तसंच, गारपिटीचा इशारा दिला आहे.

विदर्भात गारपीट होण्याची शक्यता

कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे. तर सोसाट्याचा वारा हा 40-50kmph वाहू शकतो, या भागात हलका-माध्यम पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील वरील प्रमाणेच तीव्र हवामान व (30-40kmph) शक्यता आहे. विदर्भातील वरील प्रमाणे तीव्र हवामान व 40-50 किमी वारे व गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

हेही वाचा - Maharashtra Politics: ‘UT म्हणजे Use And Throw वापरा आणि फेकून द्या’ - एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

 या जिल्ह्यांना अलर्ट

राज्यातील रायगड, सिंद्धुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, नाशिक, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांनी येलो अलर्ट देणात आला आहे. तर यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

    सोलापुरात मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी 

    सकाळपासून सोलापुरात आज ढगाळ वातावरण असल्याने उकाडा ही जाणवत होता. मात्र सोलापूर जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल होऊन पावसाची जोरदार सुरुवात झाली. सोलापूर - अक्कलकोट महामार्गांवर पावसाची जोरदार बॅटिंग झाली आहे. मागील काही दिवसात पार चाळीशी पार गेलेला पार आता कमी झाला असून या पावसामुळे सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

    गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

    हवामान विभागाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला होता. गोंदिया जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आज दुपारच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

    कोकणात अवकाळी पावसाचा आंब्यावर परिणाम 

    कोकणात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम आंब्यावर दिसू लागलाय. आंब्यावरती डाग पडल्याने आंब्याच्या बाजार भावावर परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे असलेले ढगाळ वातावरण यामुळे आंब्यावर किड रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी आंब्याचे उत्पादन कमी आणि त्यात पडलेला अवकाळी पाऊस यामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडला आहे. शासनाने आंबा बागायतदारांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आंबा बागायतदार प्रदीप सावंत यांनी केली. 

    अवकाळी पावसानंतर जयश्री थोरात शेतकऱ्यांच्या बांधावर

    अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे काल अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी डॉ.जयश्री बाळासाहेब थोरात यांनी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी गावातील कार्यकर्ते पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

    पुण्यात मुसळधार 

    पुण्यातही मुसळधार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. यामुळे उकाड्यानं त्रस्त असलेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पुण्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. तर, अनेक भागात वीजपुरवठाही खंडीत झाला होता.