जेएनएन, पंढरपूर. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर आहे. राज्यातील लाखो भाविक आषाढी कार्तिकीला पंढरपूरला भेटी देतात. या वारकऱ्यांच्या आराध्यस्थान असलेल्या या मंदिराचं जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय हा विठ्ठल रुख्मिनी मंदिर समितीनं घेतला आहे. 

मंदिर समितीच्या बैठकीत ठराव मंजूर 

त्यानुसार, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असून या अंतर्गत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला होता. दरम्यान नांदेड येथील अरगुलकर परिवाराच्यावतीने सदर दरवाजास चांदी बसवून देण्यात येत आहे.

शंकर व नरसिमलूंनी केला चांदीचा दरवाजा

या दरवाज्याला तीस किलो चांदी लागणार असून याची किंमत जवळपास तीस लाख रूपये आहे. शंकर व नरसिमलू या बंधूंनी आपले वडील स्व. दिगंबर तुकाराम अरगुलकर व आई स्व. जनाबाई यांच्या स्मरणार्थ हा दरवाजा चांदीचा केला आहे. अरगुलकर परिवार श्री विठ्ठल रूक्मिणीचे निस्सीम भक्त आहेत.

    प्रवेशद्वाराला मोठी झळाळी मिळणार 

    त्यानुसार मागील आठ दिवसापासून सदर काम सुरू आहे. यामुळे येथून भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात सदर काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराला मोठी झळाळी मिळणार आहे.