जेएनएन, मुंबई: नागपुरमध्ये सोमवारी रात्री हिंसक घटना घडल्याने महाराष्ट्राच्या लौकिकाला काळीमा फासला आहे. दगडफेक आणि जाळपोळीची घटना अत्यंत दुर्दैवी असून महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा काही शक्ती प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील शांतता व सामाजिक सौहार्द टिकवणे गरजेचे आहे. नागपूर शहरात झालेल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी करून स्थानिकांशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार एक समिती गठीत करण्यात आली आहे.

यांचा समितीत समावेश

या समितीत माजी प्रांताध्यक्ष गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, ॲड. यशोमती ठाकूर, आ. साजिद पठाण हे या समितीचे सदस्य असून नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे निमंत्रक तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील समन्वय आहेत.

समिती परिस्थितीची पाहणी करेल 

काँग्रेसची ही समिती दंगलग्रस्त भागात जाऊन परिस्थितीची पाहणी करेल व शांतता प्रस्थापीत करण्यासाठी प्रयत्न करेल अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

    सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा 

    दरम्यान, अल्पसंख्याक लोकशाही पक्षाचे (एमडीपी) शहर प्रमुख फहीम खान यांच्यासह सहा जणांवर सायबर पोलिसांच्या एफआयआरमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सायबर क्राईमचे डीसीपी लोहित मतानी यांनी सांगितले.

    आयाती जाळल्याची अफवा ठरली कारण

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीला हटवण्याची मागणी करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) नेतृत्वाखालील आंदोलनादरम्यान आयाती जाळल्याची अफवा सोमवारी हिंसाचाराचे प्राथमिक कारण ठरली, असही लोहित मतानी यांनी म्हटलं आहे.