जेएनएन, मुंबई: राज्यात ग्रामीण भागात उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवताना लूटमार सुरू असल्याची अनेक तक्रारी पाहायला मिळत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना 1 हजार ते 2 हजार रुपये आकारली जात असल्याची माहिती आहे. त्याबरोबर नंबरप्लेट घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना 40 ते 50 किलोमीटर प्रवास करत जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एजंटांमार्फत जास्त पैसे उकळले जात आहेत.

फिटमेंट सेंटरच्या अडचणींमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मनस्ताप होत आहे. बऱ्याच वाहनांनी अद्याप सुरक्षा नंबरप्लेट बसविलेली नाहीत त्यामुळे परिवहन विभागाकडून कारवाईची भीती नागरिकमध्ये निर्माण झाली आहे. शहरांसह ग्रामीण भागात नंबरप्लेट बसवण्यातील गोंधळामुळे नागरिकांना खूपच मनस्ताप सहन करावा लागत असल्याने परिवहन विभागाने लक्ष घालावे अशी मागणी नागरिक करत आहे.

30 जून अंतिम तारीख 

परिवहन विभागाच्या आदेशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वीची नोंदणी असलेल्या वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट 30 जूनपर्यंत बसविणे बंधनकारक केले आहे. राज्यात साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्त वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवावी लागणार आहे.

    परिवहन विभागाने काही खासगी कंपन्यांना हे काम दिले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्याची माहिती नसल्याने अर्ज करण्यासाठी 100 ते 200 रुपये द्यावे लागत आहेत, सोबतच एजंटकडून नवीन नंबरप्लेटसाठी मोठी रक्कम ही वसूल केली जात आहे, अशी माहिती नागरिकांकडून मिळाली आहे.