जेएनएन, मुंबई. आषाढी वारी 2025: यंदा 6 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. आषाढी आषाढी एकादशीच्या अनुषंगाने राज्यातून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असतात. यंदा देखील राज्यभरातून पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान करण्यास सुरवात केली आहे. यंदाच्या आषाढी वारी पालखी सोहळा 2025 मोठ्या भक्तिभावात पार पडणार असून, संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो वारकरी पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे स्वतंत्र वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
संत तुकाराम पालखी सोहळा 2025 चे वेळापत्रक
संत तुकाराम महाराज यांची पालखी 18 जून 2025 रोजी श्रीक्षेत्र देहू येथून प्रस्थान करणार आहे. पुढील मार्ग पुढीलप्रमाणे असेल:
- 19 जून – आकुर्डी
- 20 जून – नानापेठ, पुणे (निवडुंगा विठ्ठल मंदिर)
- 22 जून – लोणी काळभोर
- 23 जून – यवत
- 24 जून – वरवंड
- 25 जून – उंडवडी गवळ्याची
- 26 जून – बारामती
- 27 जून – सन्सर
- 28 जून – निमगाव केतकी
- 29 जून – इंदापूर
- 30 जून – सराटी
- 1 जुलै – अकलूज
- 2 जुलै – बोरगाव श्रीपुर
- 3 जुलै – पिराची कुरोली
- 4 जुलै – वाखारी
- 5 जुलै – पंढरपूर
- 6 जुलै – देवशयनी आषाढी एकादशी
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 चे वेळापत्रक
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी 19 जून 2025 रोजी श्री क्षेत्र आळंदी येथून प्रस्थान करेल. पुढील मार्ग पुढीलप्रमाणे:
- 20 जून – भवानीपेठ, पुणे
- 21 जून – पुणे शहर
- 22 जून – सासवड
- 23 जून – सासवड
- 24 जून – जेजुरी
- 25 जून – वाल्हे
- 26 जून – लोणंद
- 27 जून – तरडगाव
- 28 जून – फलटण
- 29 जून – बरड
- 30 जून – नातेपुते
- 1 जुलै – माळशिरस
- 2 जुलै – वेळापूर
- 3 जुलै – भंडीशेगाव
- 4 जुलै – वाखारी
- 5 जुलै – पंढरपूर
- 6 जुलै – देवशयनी आषाढी एकादशी
हेही वाचा:आषाढी वारी 2025: ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसाठी सजली घुंडरे घराण्याची बैलजोडी
वारीचे आध्यात्मिक महत्त्व
आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात हजारो वारकरी एकत्र येतात. या वारीत फक्त चालत जाण्याची परंपरा आहे. 'पायवाटेची भक्ती' मानणारा हा सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे सर्वोच्च दर्शन घडवतो. ज्ञानेश्वरी, अभंगवाणी आणि टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी हरिनामाचा जयघोष करीत मार्गक्रमण करतात.
पंढरपूर वारीची सुरवात कोणी केली
संत ज्ञानेश्वर महाराज (13व्या शतकात) आणि संत नामदेव महाराज हे दोघेही पंढरपूरचे अत्यंत निष्ठावान भक्त होते. त्यांनी सुमारे इ.स. 1291 साली आळंदीहून पंढरपूरकडे पदयात्रा (वारी) करण्याची परंपरा सुरू केली.
हेच पहिले वारी सोहळे मानले जातात. त्यावेळी संत नामदेव, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत जनाबाई यांसारखे अनेक संत त्यांच्या सोबत होते. त्यांनी केलेल्या या पायी यात्रेला भक्तिपंथाची चालती-फिरती शाळा असेही संबोधले जाते.
वारी परंपरेचा प्रवास17 व्या शतकात तुकाराम महाराज (देहू) आणि एकनाथ महाराज (पैठण) यांनी या परंपरेला अधिक मजबूत रूप दिले.
पुढे 18 व्या शतकात, हभप. श्री शिवरामबुवा महाराज आणि त्यांच्या वंशजांनी वारी व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली. त्यातूनच पालखी सोहळ्याची शिस्तबद्ध मांडणी सुरू झाली.
हेही वाचा:Ashadhi Ekadashi 2025: यंदा वारीला वाहनांना टोल माफी, वारकरीला अपघात विमा मिळणार