जेएनएन, अहिल्यानगर: अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी. मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या वस्त्यांतील नागरिकांना मदत करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून घेतली. अतिवृष्टीमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आले. पाण्यामुळे धोका असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
19 महसूल मंडळांतील गांवाना फटका
रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे 19 महसूल मंडळांतील गावांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये पारनेर तालुक्यातील 3, पाथर्डी तालुक्यातील 3, श्रीगोंदा तालुक्यातील 8 व कर्जत तालुक्यातील 5 मंडळांचा समावेश असल्याचे मंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. काही भागात घरांची पडझड झाली असून शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. मात्र पूरस्थिती ओसरल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल. सध्या नागरिकांना शासन स्तरावरून तातडीची मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे विविध ठिकाणी अडकलेल्या 15 लोकांना व कासारपिंपळगाव येथील 16 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून सर्व रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
कर्जत तालुक्यातील करपडी येथे एका घराला तलावाच्या पाण्याने वेढा दिला होता. या कुटुंबातील 5 व्यक्तींना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे. नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी दिल्या आहेत. पुढील दोन दिवस जिल्ह्यासाठी हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन उपाययोजना करण्याबाबतही सतर्कतेने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.