जेएनएन, मुंबई. Maharashtra Political News: पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणातून निवृत्त व्हावे हे देशाची जनता ठरवते, सकाळचा संजय राऊत यांचा भोंगा ठरविणार नाही अशी टीका भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं आणि भाजप द्वेषाची कावीळ झाली. राजकरणात 75 वर्षे वयानंतर निवृत्तीचा कोणताही नियम नाही आणि इतिहासही नाही असेही बावनकुळे यांनी सांगितले आहे.

2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प मोदींच्याच नेतृत्वाखाली पूर्ण होईल. संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. 75 वर्षे वयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही असेही बावनकुळे यांनी सांगितले आहे.

भाजप द्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना हे आठवणार नाही

    भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही. भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी वयाच्या 79 वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. तर मोरारजी देसाई वयाच्या 83 वर्षे आणि डॉ. मनमोहन सिंग तर वयाच्या 81 वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. पण मानसिक संतुलन बिघडल्याने भाजप द्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना हे आठवणार नाही.

    विरोधकांना तो अधिकार नाही

    भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही, तर निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ या देशातील जनता ठरवते, संजय राऊत किंवा विरोधकांना तो अधिकार नाही.

    विकसित भारत करण्याचा संकल्प

    2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदींनी केला आहे. हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.