जेएनएन, मुंबई: राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईसह कोकणात आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. सध्या मुंबईत मुसळधार पावसाने दाणादाण उडाली आहे.  अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर

भारतीय हवामान खात्याने आज 19 ऑगस्ट 2025 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने महानगरपालिकेकडून आज सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम 

तसेच, मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये, आस्थापना यांनी आपल्या कामकाजाच्या स्वरूपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना तातडीने द्याव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

मुंबईत शाळांना सुटी

    सहसंचालक, उच्च शिक्षण कोकण विभाग, पनवेलच्या अधिनस्त येणाऱ्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांना मंगळवार 19 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे,  संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशाने तसे कळविण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.