जेएनएन, मुंबई: मुंबई आणि उपनगरातील लोकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पनवेल-बोरिवली-वसई लोकल ट्रेन कॉरिडॉर (Panvel-Borivali-Vasai local train corridor project) या बहुचर्चित प्रकल्पाला अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीकडून मंजुरी मिळाली आहे.

या प्रकल्पामुळे मुंबईच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांला जोडला जाणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

पनवेल-बोरिवली-वसई उपनगरीय लोकल रेल्वे 69.23 किमी लांबी असणार आहे. या प्रकल्पासाठी 12,710  कोटी खर्च होणार आहे. 

प्रकल्पाची वैशिष्ट्ये!

  • हा प्रकल्प मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प अंतर्गत उभारण्यात येणार आहे.
  • पनवेल ते बोरिवली आणि वसई अशी रेल्वे कॉरिडॉरची रचना करण्यात येणार आहे.
  • विद्यमान पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईनला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असणार आहे.
  • नव्या कॉरिडॉरमुळे पनवेलहून वसई किंवा बोरिवलीला थेट लोकल प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार.

प्रवाशांना मिळणारे फायदे!

  • नवी मुंबई, रायगड, ठाणे, वसई-विरार आणि मुंबईतील लाखो प्रवाशांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल.
  • सध्या पनवेलहून वसई/बोरिवलीला जाण्यासाठी प्रवाशांना हार्बर, सेंट्रल किंवा वेस्टर्न मार्गाने बदल करून जावे लागते. नव्या कॉरिडॉरमुळे हा त्रास टळणार आहे.
  • लोकल मार्गाची गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना प्रवासात अधिक सोयीस्कर पर्याय मिळेल.

प्रकल्पाचे महत्त्व

    मुंबईत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे वाहतूक व्यवस्था प्रचंड ताणली गेली आहे. अशा स्थितीत पनवेल-बोरिवली-वसई हा कॉरिडॉर लोकल प्रवाशांसाठी एक नवा वरदान ठरणार आहे. राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जाणार आहे.