जेएनएन, मुंबई, Mumbai Rain Mumbai Local : मुंबईत आणि उपनगरात जोरदार मुसळधार पाऊस पडत असून पावसाचा मोठा परिणाम लोकल रेल्वेच्या वाहतुकीवर दिसून येत आहे. हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. सकाळी गर्दीच्या वेळेसच मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. तिन्ही लोकल मार्गावरील वाहतूक अंदाजे 30 ते 40 मिनिटे विलंबाने सुरू आहे. सोमवारपासून लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत -
मध्य रेल्वे:-
- माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ तर ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
- घाटकोपर ते दादर परिसरात रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.
- त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या 25 ते 40 मिनिटं उशिराने धावत आहेत.
- काही गाड्या रद्द करण्याचीही शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
हार्बर लाईन:-
- हार्बर मार्गावरील लोकल गाड्या सुमारे 30 मिनिटं उशिराने धावत आहेत.
- कुर्ला, वडाळा, चेंबूर परिसरात पाण्याचा प्रभाव जाणवत आहे. तर काही ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचले आहे.
पश्चिम रेल्वे:-
- पश्चिम मार्गावर गाड्या उशिरा धावत आहेत.
- पश्चिम मार्गावरील लोकल गाड्या 15 मिनिटं उशिरा धावत आहे.
- सकाळच्या गर्दीच्या वेळी हजारो चाकरमान्यांना प्लॅटफॉर्मवर ताटकळत उभे राहावे लागत आहे.
- गाड्या वेळेवर न आल्यामुळे स्टेशनवर गर्दी वाढली चालली आहे.
प्रशासनाचे आवाहन -
मुंबई महापालिकेने (BMC) आणि हवामान विभागाने नागरिकांना इशारा दिला आहे की, गरज नसल्यास घराबाहेर पडू नये.
पुढील काही तासांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.