मुंबई. Maharashtra Weather News : राज्यात थंडीची लाट नसली तरी वातावरणात गारठा वाढला आहे. अनेक जिल्ह्यात तापमानाचा आकडा मात्र 10 अंशांच्या खाली गेला आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पहाटे व रात्रीच्या वेळी किमान तापमानात प्रचंड घट होत असून थंड वारे वाहत आहे. तर दिवसा उकाडा जाणवत असल्याचे दिसत आहे. राज्यभर अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. मुंबईसह कोकणामध्ये दुपारच्या वेळी असह्य उकाडा जाणवत आहे.
काश्मीरमध्ये बर्फ पडत असून तेथील तापमानाच प्रचंड घट झाली आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात घट होत असून पारा सरासरी 10 ते 9 अंशांच्या खाली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांचा पारा घसरला -
राज्यभर थंडीने हुडहुडी भरली असून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे, पिंपरी-चिंचवड, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्रता जाणवत आहे. विदर्भातील गोंदिया, यवतमाळ आणि गडचिरोली या भागांत किमान तापमान लक्षणीयरीत्या घसरले आहे. नागपूरमध्ये बोचरी थंडी अनुभवायला मिळत आहे.
31 डिसेंबरला कसे राहील हवामान -
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर, म्हणजेच वर्षाच्या अखेरीस राज्यात थंडी कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. सध्या सुरू असलेला हा थंड हवामानाचा टप्पा नववर्षाच्या सुरुवातीपर्यंतही टिकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Min. Temperature: No large change in minimum temperature over Maharashtra for next 24 hours and fall by 2-3 deg C during subsequent 2-3 days and gradual rise thereafter. pic.twitter.com/8YS0gLtgKr
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) December 30, 2025
दिल्लीवर धुक्याची चादर, विमान व रेल्वे सेवा विस्कळीत -
वर्षाच्या शेवटच्या दिवशी, बुधवारी, दिल्ली आणि इतर एनसीआर शहरांसह, राष्ट्रीय राजधानीतील लोकांची सकाळ दाट धुक्यासोबत झाली. दाट धुक्यामुळे रस्त्यांवरील आणि अनेक भागात दृश्यमानता कमी झाली, ज्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक विस्कळीत झाली.
दाट धुक्यामुळे आज दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर एकूण 148 उड्डाणे रद्द करण्यात आली आणि 150 हून अधिक उड्डाणे उशिराने झाली. उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
कडाक्याच्या थंडीसोबतच, राजधानीतील लोकांना प्रदूषणाचाही सामना करावा लागत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये आज हवेची गुणवत्ता अत्यंत खराब राहिली. आज सकाळी, दिल्लीचा सरासरी एक्यूआय 384 नोंदवला गेला, जो अत्यंत वाईट श्रेणीत येतो.
एनसीआरमध्ये दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतूक आणि विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. शिवाय, दाट धुक्यामुळे महामार्गांवरील वाहनांचा वेग मंदावला आहे.
दरम्यान, दाट धुक्यामुळे, दिल्ली विमानतळाने प्रवाशांसाठी एक सूचना जारी केली आहे. आज 148 उड्डाणे रद्द करण्यात आली, तर 150 हून अधिक उड्डाणे उशिरा झाली. दरम्यान, रेल्वे स्थानकांवर, प्रवासी त्यांच्या नियोजित गाड्यांची वाट पाहत आहेत, कारण धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे अनेक ट्रेन विलंबाने धावत आहेत.
दाट धुक्यामुळे, सध्या CAT III प्रोटोकॉल अंतर्गत विमान वाहतूक सुरू आहे, ज्यामुळे सुमारे 150 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
