जेएनएन, मुंबई. Maharashtra crops damage: “ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा, राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान 

राज्यात पावसाचे थैमान चालू असून गेल्या दोन महिन्यात अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यांतील 195 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे 654 महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

17 लाख 85 हजार 714 हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित

    कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात 17 लाख 85 हजार 714 हेक्टर (42 लाख 84 हजार 846 एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. यात प्रामुख्याने खरीप शेतपिकांचे नुकसान झाले असून सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे.  

    सर्वाधिक बाधित जिल्हे:

    • नांदेड – 728,049 हेक्टर
    • वाशीम – 203,098 हेक्टर
    • यवतमाळ – 318,860 हेक्टर
    • धाराशिव – 1,57,610 हेक्टर
    • अकोला – 177,466 हेक्टर
    • सोलापूर – 47,266 हेक्टर
    • बुलढाणा – 89,782 हेक्टर

    हेही वाचा - Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या; नवीन वर्षात होणार निवडणूक 

    बाधित पिके: 

    सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.

    एकूण बाधित जिल्हे:

    नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे.