नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ सप्टेंबर 2026 मध्ये संपत आहे आणि त्यांचा कार्यकाळ 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत वाढवला जाईल असे मानले जात होते. परंतु, नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वीच रोहितची कारकीर्द संपल्याची बातमी, त्यानंतर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी मुख्य निवडकर्त्याशी चर्चा न करताच 'जोपर्यंत रोहित संघाच्या योजनेत आहे, तोपर्यंत तो खेळेल' असे म्हणणे आणि मग माजी कर्णधाराने केलेले शतक, यांमुळे परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच बिकट झाली आहे.
आगरकर यांचा कार्यकाळ यावर्षी जूनमध्ये संपला, परंतु बीसीसीआयने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. सुरुवातीला, त्यांचा कार्यकाळ जून 2027 पर्यंत वाढवण्याचा विचार होता, परंतु आता बीसीसीआयचे काही अधिकारी 'सेंटर ऑफ एक्सलन्स इन क्रिकेट'चे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्त करण्याचा विचार करत आहेत. तथापि, हा प्रस्ताव अद्याप विचाराधीन असून, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर निर्णय घेतला जाईल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना वाटते की, लक्ष्मण यांच्या मतांना अधिक महत्त्व दिले जाईल आणि रोहित व विराटसारखे वरिष्ठ खेळाडूदेखील त्यांचा सल्ला ऐकतील.
आगरकरचा पत्ता अजून पूर्णपणे कट नाही -
जुलै 2023 मध्ये आगरकरची भारतीय पुरुष संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीने भारतीय क्रिकेटसाठी अनेक मोठे निर्णय घेतले आणि या काळात टीम इंडियाने दोन टी-20 विश्वचषक आणि एका चॅम्पियन्स ट्रॉफीसह तीन आयसीसी विजेतेपदे जिंकली. तथापि, गेल्या काही महिन्यांत त्यांच्या अनेक निवड निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 2027 चा एकदिवसीय विश्वचषक लक्षात घेता, त्यांना एक वर्षाची मुदतवाढ द्यावी की लक्ष्मण यांना संघात घ्यावे, याचा विचार बीसीसीआय अजूनही करत आहे.
सर्व काही श्रीलंकेतील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या निकालावर अवलंबून आहे. जर भारताने ही मालिका जिंकली, तर आगरकर यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो. दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे होणाऱ्या 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत आपल्या पदावर राहण्यास आगरकर स्वतः उत्सुक आहेत. मात्र, सूत्रांनुसार, बीसीसीआयने त्यांना या संदर्भात कधीही कोणतेही स्पष्ट आश्वासन दिले नाही. आता, मंडळाची भूमिका बदलत असल्याचे दिसत आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.
या शर्यतीत आघाडीवर असलेले लक्ष्मण, सध्या बंगळूरुस्थित 'सेंटर ऑफ एक्सलन्स'मध्ये क्रिकेट प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये केवळ राष्ट्रीय क्रिकेट कार्यक्रमांवरच नव्हे, तर 19 वर्षांखालील संघाच्या विकासावर देखरेख ठेवणे, प्रशिक्षण रचना, शैक्षणिक कार्यक्रम आणि क्रीडा विज्ञान विभाग यांच्यात समन्वय साधणे यांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांत, लक्ष्मण भारतीय क्रिकेटच्या विकास प्रणालीतील एक प्रमुख व्यक्ती म्हणून उदयास आले आहेत.
जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे दोन भारतीय संघ एकाच वेळी खेळतात, तेव्हा त्यांनी अनेकदा दुसऱ्या भारतीय संघाचे किंवा दौऱ्यावर आलेल्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे दौऱ्यात त्यांनी प्रभारी मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले. जर बीसीसीआयने लक्ष्मण यांची मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली, तर भारतीय क्रिकेटच्या निवड पद्धतीत हा एक मोठा बदल ठरेल. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणि सेंटर्स ऑफ एक्सलन्समध्ये खेळाडू विकासाचा व्यापक अनुभव असलेल्या लक्ष्मण यांच्यावर भारतीय संघाची भविष्यातील दिशा ठरवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल.
रोहितला खेळवावे की नाही यावरून वाद शिगेला-
भारतीय संघाच्या व्यवस्थापनाची रोहित शर्माने 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळावे अशी अजिबात इच्छा नाही. इंग्लंड दौऱ्यादरम्यान, एका निवडकर्त्याने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडे याबद्दल स्पष्टपणे सांगितलेही होते. रोहितशीही चर्चा झाली होती, पण 16 जुलै रोजी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो बाद झाल्यानंतर लगेचच, माजी भारतीय कर्णधाराचा लॉर्ड्सवरील सामना हा त्याचा शेवटचा असेल अशी बातमी पसरली.
इंटरनेटवर झालेल्या जोरदार चर्चेनंतर, बीसीसीआय सचिवांनी 17 जुलै रोजी एक निवेदन जारी करून सांगितले की, जोपर्यंत रोहित संघाच्या योजनांचा भाग राहील, तोपर्यंत तो संघाचा नियमित सदस्य राहील. 19 जुलै रोजी रोहितने 138 धावा केल्या, पण भारतीय संघ सामना हरला. रोहितशिवाय भारतीय संघ 2027 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकू शकत नाही, असे अनेक निवडकर्त्यांना वाटते, तर दुसरीकडे बीसीसीआयचे काही अधिकारी इंटरनेट मीडियाच्या आधारे आपली रणनीती बदलत आहेत.
हे ही वाचा -लाल ड्रेस अन् नशीले डोळे.. अर्शदीप सिंगच्या गर्लफ्रेंडच्या अदांवर चाहते फिदा, Video मध्ये दिसला कातिल जलवा
इंग्लंड-आयर्लंड सामन्यातील पराभवाची समीक्षा नाही -
आयर्लंड आणि इंग्लंडमधील 10 सामन्यांतील आठ पराभवांचा आढावा घेणारी बैठक अद्याप झालेली नाही. इंग्लंड दौरा संपल्यानंतर ही आढावा बैठक होणार होती, पण आता संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांच्या आजारपणामुळे ही आढावा बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक भविष्यात होऊ शकते, ज्यामध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ऑनलाइन सहभागी होण्याची शक्यता आहे.
