कोलकाता: Trinamool Congress: बंगाल विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संकट अधिकच गडद होत असल्याचे दिसत आहे. लोकसभेतील तृणमूल काँग्रेसचे अनेक खासदार भाजपच्या संपर्कात असून, त्यातील एक मोठा गट पक्ष सोडून जाण्याची शक्यता आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

सूत्रांनुसार, लोकसभेतील तृणमूलच्या 29 खासदारांपैकी सुमारे 12 जणांनी भाजपमध्ये सामील होण्याचे किंवा भाजपला पाठिंबा देण्याचे आधीच ठरवले आहे. इतर पाच-सहा खासदारांसोबतही चर्चा सुरू आहे.

पक्षांतरबंदी कायदा टाळण्यासाठी 20 खासदारांचा पाठिंबा आवश्यक -

असे सांगितले जात आहे की, पक्षांतरबंदी कायदा टाळण्यासाठी किमान 19-20 खासदारांना एकत्र आणण्याची रणनीती आखली जात आहे.

राजकीय सूत्रांच्या दाव्यानुसार, तृणमूल नेतृत्वालाही या संभाव्य फुटीची कुणकुण लागली असून, पक्षाला एकसंध ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

अशी अफवा आहे की, माजी मुख्यमंत्री आणि टीएमसी सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या जवळचे मानले जाणारे काही खासदार आणि त्यांचे भाचे व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांचा त्यामध्ये समावेश आहे. भाजपसाठी ही बाब राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

    राज्यसभेतील तृणमूल खासदारांवरही भाजपची नजर -

    सध्या लोकसभेत भाजपचे 240 खासदार असून, सरकार मित्रपक्षांच्या पाठिंब्याने चालत आहे. जर तृणमूलचे मोठ्या संख्येने खासदार भाजपमध्ये सामील झाले, तर पक्षाची ताकद आणखी वाढेल आणि मित्रपक्षांवरील त्याचे अवलंबित्व कमी होईल.

    सूत्रांनुसार, लोकसभा निवडणुकांनंतर भाजप राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसच्या खासदारांवरही लक्ष ठेवून आहे. आयपॅकच्या भूमिकेबद्दल आणि संघटनात्मक शैलीबद्दल तृणमूल काँग्रेसमध्ये असंतोष असल्याचीही चर्चा आहे. तथापि, या दाव्यांना अद्याप दोन्ही पक्षांकडून अधिकृतपणे दुजोरा देण्यात आलेला नाही.