पुणे. Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : राज्यातील 288 नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निकालत भाजपने 120 जागा जिंकून आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केलं आहे. महायुतीने 212 जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली असून महाविकास आघाडीला 50 चा आकडाही गाठता आलेला नाही. महाविकास आघाडीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसच्या या विजयावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जळजळीत टीका केली आहे.

'काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करुन भाजपची बी-टीम म्हणून काम करत जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला' असा स्फोटक आरोप  रोहित पवार यांनी केली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने सर्वाधिक 34 जागा जिंकल्या आहे. काँग्रेसच्या विजयावर रोहित पवार यांनी ट्वीट करून नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.

रोहित पवारांनी म्हटलं आहे की, महत्त्वाचं म्हणजे काही अपक्षांनी तसंच धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपाच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करुन भाजपाची बी-टीम म्हणून काम करत जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला आणि लोकंही त्यांच्या या तिरक्या चालीला बळी पडले. त्यामुळं यापुढं काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा, हाही प्रश्नच आहे.

काय म्हटले आहे रोहित पवारांनी -

रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जनतेने दोनदा मतांचं दान भरभरुन पदरात टाकलं, त्यांच्या मी कायम ऋणात राहिल, पण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि उमेदवारांनीही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली तरी आज लागलेला हा निकाल अत्यंत निराशाजनक आणि काम करणाऱ्याला नाऊमेद करणारा आहे. जनतेवर आक्षेप नाही पण सगळीकडे पैसाच चालत असेल तर बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार आणि इतर अशा राजकीय दृष्टीकोनातून दुर्लक्षित आणि सामान्य कुटुंबातील उमेदवारांना आम्ही सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्नच आहे. 

आज तत्व आणि विकासावर चालणारं स्वच्छ राजकारण कमी आणि पैशांनी गढूळ झालेलंच अधिक दिसतं. म्हणूनच आमच्या विरोधात निवडून आलेल्या काही लोकांचे कारनामे आणि धंदे बघितले तर चारचौघात त्या धंद्यांचं नाव घेण्याचीही लाज वाटते… मग अशा परिस्थितीत डोक्यात विचारांचं काहूर उठल्याशिवाय राहत नाही! 

    महत्त्वाचं म्हणजे काही अपक्षांनी तसंच धर्मनिरपेक्ष आणि समतेचा जप करणाऱ्या काँग्रेसने भाजपाच्या उमेदवाराला स्वतःच्या तिकिटावर उभं करुन भाजपाची बी-टीम म्हणून काम करत जातीयवादी पक्षाच्या विजयाला हातभार लावला आणि लोकंही त्यांच्या या तिरक्या चालीला बळी पडले. त्यामुळं यापुढं काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवरही कसा विश्वास ठेवायचा, हाही प्रश्नच आहे.