जेएनएन, पुणे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

अपघातप्रकरणी ट्रकचालकाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालकाचे नाव बालाजी एकनाथ डक (वय 70) असे असून तो नांदेड जिल्ह्यातील पिंपळगावचा रहिवासी आहे. संबंधित ट्रक हा वारीसाठीचा शिधा घेऊन जात होता.

चालकाची कबुली

चौकशीदरम्यान चालकाने पोलिसांसमोर महत्त्वाची कबुली दिली आहे. त्याला सर्दीचा त्रास होत असल्याने त्याने एकाचवेळी सर्दीच्या दोन गोळ्या घेतल्या होते. त्यानंतर ट्रक चालवत असताना त्याला डुलकी आल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे त्याने सांगितले. या कबुलीनंतर पोलिसांकडून औषधांचा परिणाम, चालकाची वैद्यकीय तपासणी तसेच अपघाताचे नेमके कारण याबाबत सखोल तपास सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक

या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, जखमींवर तातडीने आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

    मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की, दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. 

    मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, जेजुरीजवळ झालेल्या या अपघातात तीन वारकऱ्यांचा मृत्यू ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

    तपास सुरू

    दरम्यान, पोलिसांनी ट्रकचालकाची चौकशी सुरू ठेवली असून, त्याच्या वैद्यकीय अहवालासह वाहनाची तांत्रिक तपासणी, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे अपघाताचे नेमके कारण निश्चित केले जाणार आहे. चालकाने घेतलेल्या औषधांचा अपघाताशी थेट संबंध होता का, याचाही तपास केला जात आहे.ही घटना वारीसारख्या पवित्र सोहळ्यात घडल्याने राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात असून, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.