सातारा : Marathi Sahitya Sammelan 2026 : ऐतिहासिक शाहू नगरीत साताऱ्यात आज (शुक्रवार) दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. ‘स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी’ (शाहू क्रीडा संकुल) येथे ध्वजारोहणाच्या मंगल सोहळ्याने या साहित्य संमलेनाचा १ जानेवारी रोजी सायंकाळी शुभारंभ झाला होती.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा-शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशन, सातारा आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने सातारा येथे 1 ते 4 जानेवारील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे सातारा येथे आयोजन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या ऐतिहासिक प्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, 98 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाहक सुनीताराजे पवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, ज्येष्ठ उद्योजक भालचंद्र जोशी, संदीप शहा, रवींद्र बेडकीहाळ यांसह अनेक साहित्यिक, मान्यवर, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तारा भवाळकरांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन -

संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन 98 व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. हजारो पुस्तकांनी सजलेली ही ग्रंथनगरी वाचकांसाठी ज्ञानाचा खजिना ठरत आहे. साहित्याच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या विविध कट्ट्यांचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

    33 वर्षांनी साताऱ्यात साहित्य संमेलन -

    तब्बल ३३ वर्षांनंतर साताऱ्यात साहित्यिकांचा भव्य मेळा उभा राहणार असल्याने स्थानिक नागरिक आणि साहित्य रसिक उत्सुकतेने या सोहळ्यासाठी वाट पाहत होते. संमेलनात मुख्य मंडपासह ग्रंथ प्रदर्शन, कवी-गझल कट्टा आणि विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यासाठी स्वतंत्र मंडप आणि तीन सभागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. साताऱ्यातील हे संमेलन मराठी साहित्याच्या शतकप्रवाहात एक ऐतिहासिक टप्पा ठरणार असून, साहित्य रसिक आणि स्थानिक नागरिक यांच्यासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे.