मुंबई. Palghar Sadhu Lynching case : पालघर जिल्ह्यात एप्रिल 2020 मध्ये टाळेबंदीच्या काळात घडलेल्या धक्कादायक साधू हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चार आरोपींना जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जमावाकडून झालेल्या अमानुष मारहाणीमध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपींविरोधात दोषारोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे सकृतदर्शनी निरीक्षण नोंदवत न्यायालयाने जामीनाच्या मागण्या फेटाळल्या.
राजेश राव, सुनील दळवी, सजनुआ बुरकुड आणि विनोद राव या चार आरोपींनी उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. प्रकरणातील इतर काही आरोपींना यापूर्वी जामीन मंजूर झाल्याचा दाखला देत, तसेच गेली चार वर्षे कारागृहात असल्याचा मुद्दा मांडत त्यांनी दिलासा मागितला होता. मात्र, न्यायालयाने हे सर्व युक्तिवाद फेटाळून लावत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आरोपींचा सक्रीय सहभाग असल्याचे स्पष्ट केले.
न्यायालयाने नमूद केले की, या टप्प्यावर उपलब्ध असलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपास यंत्रणेकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे पाहता आरोपींना दोषी ठरवण्यास पुरेसा आधार आहे. त्यामुळे केवळ दीर्घकाळ कारावासात असल्याचे कारण जामिनासाठी ग्राह्य धरता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण 42 आरोपींना विविध टप्प्यांवर जामीन मंजूर झाला आहे. मात्र, या चार आरोपींची भूमिका तुलनेने अधिक गंभीर असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ नये आणि न्यायप्रक्रियेवर परिणाम होऊ नये, यासाठी जामिनाचा अर्ज फेटाळणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
एप्रिल 2020 मध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली होती. टाळेबंदीच्या काळात अफवांमुळे जमावाकडून झालेल्या या हत्याकांडाने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण केला होता. या प्रकरणाचा खटला अद्याप न्यायालयात सुरू असून, पुढील सुनावणीदरम्यान महत्त्वाचे साक्षीदार तपासले जाण्याची शक्यता आहे.
