एजन्सी, नाशिक: बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या स्वयंघोषित बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची पोलीस कोठडी नाशिकमधील एका न्यायालयाने रविवारी 1 एप्रिलपर्यंत वाढवली.

काय आहे अशोक खरात प्रकरण

अशोक खरात हा नाशिक जिल्ह्यातील मिरगाव येथील मंदिर ट्रस्टचे प्रमुख होता. त्याच्याकडे अनेक प्रमुख राजकारण्यांनी गेल्या काही वर्षांत भेट दिल्या होत्या. त्या खरातवर एका महिलेने तीन वर्षांपासून वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपानंतर 18 मार्च रोजी त्याला अटक करण्यात आली.

शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात आतापर्यंत 10 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, त्यापैकी आठ लैंगिक अत्याचार किंवा शोषणाच्या आरोपाखाली आणि दोन फसवणुकीच्या आरोपाखाली आहेत.

100 हून अधिक तक्रारी

त्याच्या विरोधात तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) गेल्या काही दिवसांत फोनवरून 100 हून अधिक तक्रारी मिळाल्या आहेत, त्यापैकी बहुतांश तक्रारी महिलांकडून आहेत, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले.

    त्याची पूर्वीची पोलीस कोठडी संपल्यानंतर रविवारी खरातला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने खरातला विचारले की त्याला काही तक्रारी आहेत का, त्यावर त्याने नकारार्थी उत्तर दिले.

    सरकारी वकील सुनावणीदरम्यान काय म्हणाले

    सुनावणीदरम्यान, सरकारी वकील शैलेंद्र बागडे म्हणाले की, या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून आरोपी सहकार्य करत नाहीये.

    आरोपीच्या मालमत्तेची चौकशी अजून व्हायची आहे. अनेक महिला अजूनही तक्रारी दाखल करण्यासाठी पुढे येत आहेत आणि खरात पीडितांचे लैंगिक शोषण करण्यापूर्वी त्यांना भुरळ घालण्यासाठी जे तथाकथित 'पाणी' किंवा द्रव देत असे, त्याची चौकशी होणे बाकी आहे, असे ते म्हणाले.

    आरोपीच्या मोबाईल फोनमधील डेटा स्कॅन करण्यात आला असून, क्लोन रिपोर्ट प्राप्त झाला आहे. त्याने त्याच्या संपर्कांची नावे - विशेषतः राजकीय नेत्यांची - बनावट ओळखींनी जतन केली होती का, याची चौकशी केली जाणार असून अनेक डिजिटल पुराव्यांची तपासणी अजून व्हायची आहे, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

    प्रकरण मोठे असून चौकशीसाठी इतरांनाही आरोपीसमोर हजर करावे लागेल. या गुन्ह्यात कोणी साथीदार सामील होते का, हे देखील तपासातून अद्याप निश्चित व्हायचे आहे. या सगळ्यासाठी खरातची तीन दिवसांची कोठडी आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

    एसआयटीने खरातचे लॅपटॉप, मोबाईल फोन आणि काही कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली.

    एसआयटी अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनीही न्यायालयाला आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती दिली आणि खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. 

    मात्र, बचाव पक्षाचे वकील सचिन भाटे म्हणाले की, पूर्वीच्या सुनावणीदरम्यान पोलीस कोठडीसाठी जी कारणे देण्यात आली होती, तीच कारणे एसआयटी आताही देत ​​आहे.

    तपास पूर्ण झाला असून पोलीस कोठडी वाढवण्याचे कोणतेही कारण नाही, असा दावा करत त्यांनी विचारले की, "एसआयटीने आतापर्यंत तपासात काय केले आहे?" 

    दुसरीकडे, एका पीडितेचे प्रतिनिधित्व करणारे वकील एम. वाय. काळे यांनी खरातची पोलीस कोठडी वाढवण्याच्या सरकारी वकिलांच्या मागणीला पाठिंबा दिला. 

    आरोपीने सहकार्य केले नाही आणि त्यासाठी तपास यंत्रणेला जबाबदार धरता येणार नाही, असे ते म्हणाले.

    हे आरोप आणि गुन्हे अत्यंत घृणास्पद आणि समाजविघातक आहेत. त्यांच्यामध्ये कुटुंबे उद्ध्वस्त करण्याची आणि व्यापक समाजावर परिणाम करण्याची क्षमता आहे. त्यामुळे, आरोपांचे स्वरूप गुंतागुंतीचे असल्याने पोलीस कोठडीच्या मागणीवर विचार केला पाहिजे,” असे काळे यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले. 

    युक्तिवाद ऐकल्यानंतर, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (14 वे) एम. व्ही. भारडे यांनी खरातची पोलीस कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढवली.