जेएनएन, मुंबई. विधानसभेच्या अधिवेशनात (Maharashtra Winter Session 2025) आज काँग्रेसचे आमदार आणि माजी अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत केले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अचानक रद्द करण्यात आल्या, ही कृती पारदर्शक नसून पूर्णपणे अयोग्य असल्याचा आरोप पटोले यांनी सभागृहात केला.

पटोलेंची मागणी

पटोले म्हणाले की, राज्य निवडणूक आयुक्तांनी घेतलेले निर्णय प्रक्रियेला धक्का देणारे आहेत आणि लोकशाही व्यवस्थेतील निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेला बाधा आणणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करावी, तसेच “राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याचे निर्देश द्यावेत आणि त्यांच्या विरोधात महाभियोग दाखल करावा,” अशी मागणी पटोले यांनी  सभागृहात केली. 

अध्यक्षांचे उत्तर

मात्र या मागणीवर त्वरित प्रतिसाद देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली. अध्यक्ष म्हणाले की, राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याचा अधिकार विधिमंडळाकडे नाही. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पदावरून दूर करण्यासाठी जी प्रक्रिया असते, त्याच प्रकारची तरतूद राज्य निवडणूक आयुक्तांसाठी आहे. त्यामुळे ही कार्यवाही सभागृहाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही.

पटोले यांनी केलेली मागणी अमान्य 

    अध्यक्षांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती व पदच्युतीबाबतची प्रक्रिया संविधानात वेगळी नमूद आहे आणि विधिमंडळाला त्यात कोणताही हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे पटोले यांनी केलेली मागणी प्रक्रिया दृष्टीने अमान्य ठरते.