जेएनएन, नागपूर Nashik Ashok Kharat Case: महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले. तसंच, त्यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारबाबत मोठा आरोप केला आहे.

या प्रकरणात हवेत बोलण्यात काहीही अर्थ नाही. अशोक खरात प्रकरण हे अत्यंत गंभीर आहे. आम्हीच गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणाचा भांडाफोड केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ते रविवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics News)

आम्हाला कल्पना होती की, सामाजिक दबावामुळे अशा प्रकरणांमध्ये महिला एकदम पुढे येत नाहीत. त्यामुळे पिडीत महिलांना आणि त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काहीप्रमाणात महिला याला प्रतिसाद देत आहेत. या प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावर तपास सुरु आहे. मी स्वत: राज्याच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. त्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार करण्यात आले आहे. नाशिक पोलीस आयुक्त आणि एसआयटी मिळून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात दोषी असलेल्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. पण काहीजण या सगळ्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणाजवळ काही पुरावे असतील तर ते आणून द्यावेत, कारवाई केली जाईल. परंतु, विनाकारण या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला.

अशोक खरात याच्याकडे अनेक लोक जायचे. विरोधी पक्षातील कोण जायचं याचे पुरावे मी देऊ शकतो. या प्रकरणाचे सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत. म्हणजे ते पोलिसांकडे आहेत. तपास करणे माझे काम नाही, ते काम पोलिसांचे आहे. महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचा सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. पण कोणी अशोक खरात यांना फक्त भेटलंय म्हणून त्यांच्यावर कारवाई करायला लागलो तर काय-काय करावं लागेल, याचा विचार करा.

तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर टीका

खरातला नियम डावलून कोणी पाणी दिलं होतं, कोणी 40 किलोमीटरची पाण्याची लाईन दिली होती, हे तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात कोणी राजकारण करु नये. हा महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

    अशोक खरात याच्याशी संबंधित असलेल्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले जात आहेत. पण राजकीय व्यक्तींचे फोटो कोणसोबतही असू शकतात. ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन खरातसाठी 40 किलोमीटरची पाण्याची लाईन मंजूर केली, त्यांना काय शिक्षा द्यावी?  मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे या मुद्द्यावर शांत का बसतात? आम्हाला या सगळ्याचे राजकारण करायचे नाही. महिलांची प्रतिष्ठा आमच्यासाठी महत्त्वाची आहे,  यावेळी या पाणीपुरवठ्याच्या निर्णयाची चौकशी होणार का? असं पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले. आधी महिलांशी संबंधीत प्रकरण सोडवू नंतर चौकशीच बघू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.