जेएनएन, मुंबई | Mahavikas Aghadi Mumbai Morcha : मुंबईत आज ‘सत्याचा मोर्चा’च्या माध्यमातून विरोधकांचा मोठा राजकीय शक्तीप्रदर्शन होणार आहे. ईव्हीएम आणि मतदार यादीतील कथित घोटाळ्यांविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चात राज ठाकरे स्वतः लोकल ट्रेनने प्रवास करून सहभागी होणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे मुंबईकरांमध्ये उत्सुकता आणि उत्साहाचं वातावरण आहे.

राज ठाकरे लोकलने येणार-

राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात जाहीर केलं होतं की ते साध्या मुंबईकरांप्रमाणे लोकल ट्रेनने प्रवास करून मोर्चात येणार आहेत. या घोषणेमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली असून, ठाणे, दादर, आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांवर मनसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. राज ठाकरेंच्या या निर्णयाला प्रतीकात्मक महत्त्व दिलं जात आहे.

आज होणाऱ्या मोर्चात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यासह मुंबईतील महत्वाचे पदाधिकारी आणि नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.मात्र काँग्रेस पक्षाकडून मोर्चाला दांडी मारली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे व राज ठाकरेंनी काही दिवसापूर्वी कार्यकर्ते मेळावे घेऊन या मोर्चाबद्दल वातावरण निर्मिती केली आहे. या मोर्चाच्या आयोजनासंदर्भात महाविकास आघाडी व मनसेची एक बैठकही पार पडली होती व त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मतदार यादीतील घोळ दुरुस्त होईपर्यंत निवडणुकांना विरोध राहील, यावर विरोधकांचे एकमत झाल्याचे सांगण्यात आले होते. रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात मतदारयंत्र, मतदार याद्यांसंदर्भात प्रेझेन्टेशन करून जनजागृती केली होती. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंनीही याबाबत सादरीकरण करून वातावरण ढवळून काढले आहे. मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहण्याचं आवाहन शिवसेना व मनसेकडून मुंबईकरांना केलं आहे. 

कोणत्या मागण्यांसाठी आजचा मोर्चा? 

     मतदारयाद्यांतील दुबार नावे काढून टाकणे.

     मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका घेऊ नये

     सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा

     मतदारयाद्या अद्ययावत करणे.

    मुंबई महापालिका मुख्यालयाच्या समोर स्टेज उभारण्यात आले असून येथे महाआघाडीतील नेत्यांची भाषणे होणार आहेत. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील व इतर काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणे होतील. या मार्चाला शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित राहणार नाहीत.