जेएनएन, मुंबई. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. या दुर्दैवी अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी 8:45 च्या सुमारास घडली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. तसंच,  राज्यात आज शासकीय सुटी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही थोड्याच वेळात बारामतीसाठी रवाना होत आहेत. राज्यात आज शासकीय सुटी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

‘दादा गेले! जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

    त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

    माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत. थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे.’ अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. 

    अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू

    मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीला रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या विमानात आणखी चार जण होते. निवडणुकीच्या प्रचारासाठी पवार बारामतीला आले होते. लँडिंग करताना त्यांचे विमान अचानक धावपट्टीवर कोसळले आणि त्यात बसलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला.