जेएनएन, पुणे. Maharashtra Weather News: राज्यात सध्या हवामानाचा “डबल अटॅक” पाहायला मिळत आहे. एकीकडे उष्णतेचा तडाखा तर दुसरीकडे अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने 30 मार्च ते 5 एप्रिलदरम्यान राज्यात गारपिटीसह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या भागात गारपिटीचा अंदाज

हवामान खात्याच्या अंदाजानुसार खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित विदर्भातही हवामानात अचानक बदल होऊ शकतो. 

दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या अंशतः ढगाळ वातावरण असून ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसात उकाडा आणि संध्याकाळी पावसाचे चित्र असे बदलते वातावरण अनुभवायला मिळू शकते. 

मुंबईसह उपनगरांमध्ये उन्हाळ्याचा कडाका 

दुसरीकडे, मुंबईसह उपनगरांमध्ये उन्हाळ्याचा कडाका वाढला आहे. शुक्रवारी मुंबईत कमाल तापमान 37.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, ज्यामुळे नागरिक हैराण झाले. ठाण्यातही तापमानाचा पारा 39 अंशांपर्यंत पोहोचला. पुढील दोन दिवस तापमानात फारसा बदल होणार नसल्याने मुंबईकरांचा शनिवार-रविवार ‘हॉट’ जाण्याची शक्यता आहे. 

    शेतकऱ्यांसाठी इशारा!

    या अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, काढणीस आलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी साठवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.एप्रिल महिन्याची सुरुवात राज्यात उष्णता आणि पावसाच्या मिश्र परिणामाने होणार असल्याचे चित्र असून नागरिकांनी हवामानाच्या बदलत्या परिस्थितीबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.