जेएनएन, मुंबई: राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे (GR) ओबीसी (OBC) समाजाचे नुकसान होत आहे. त्यामुळे मराठवाडा पेटला आहे. ओबीसी समाजात अस्वस्थता वाढत असून या निर्णयामुळे ओबीसी- मराठा संघर्ष पुन्हा भडकला आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला.

शासन निर्णयामुळे नुकसान – वडेट्टीवारांचा आरोप

ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे बाहेर एक भूमिका मांडतात, तीच भूमिका त्यांनी बैठकीतही मांडावी, अशी मागणी वडेट्टीवारांनी केली.

"ओबीसी आरक्षणावर गदा आणणारा निर्णय सरकारनेच काढला आहे. तो कोण रद्द करणार आणि कधी करणार?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरकारच पाडलं पाहिजे! 

    वडेट्टीवारांनी छगन भुजबळांवर निशाणा साधत म्हटले की, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना पाडा असे भुजबळ म्हणत असतील, तर सरकारच पाडलं पाहिजे. कारण निर्णय तर सरकारचाच आहे. एकीकडे मुख्यमंत्री व सरकारचे कौतुक करायचे, दुसरीकडे टीका करायची हा दुटप्पीपणा आहे." 

    पुरावे देऊ, सरकारने बैठक बोलवावी

    ओबीसी आरक्षणाला जर धक्का बसत नसेल, तर सरकारने सर्व नेत्यांना बोलावून बैठक घ्यावी. त्या बैठकीत आम्ही पुरावे सादर करू की ओबीसी समाजाचे कसे नुकसान होत आहे, असे वडेट्टीवारांनी सांगितले.