जेएनएन, मुंबई: नगर पालिकेनंतर आता रायगडमधील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या राजकारणात (Raigad ZP-Panchayat elections) नव्या घडामोडी घडत आहेत. महायुतीच्या एकत्रित लढतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यात महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे म्हणाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणेच निवडणूक लढवणार
तटकरे म्हणाले की, “रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणेच निवडणूक लढवणार आहे. महायुतीचा मुद्दा येथे लागू पडत नाही.” त्यांनी यापूर्वी रायगडमधील शिवसेना आमदारांनी वारंवार राष्ट्रवादीसोबत युती करण्यास नकार दिल्याची आठवण करून दिली. शिवसेनेच्या त्या भूमिकेचा उल्लेख करत तटकरे म्हणाले की, “ज्यांनी आम्ही युती करणार नाही असं आधी जाहीर केलं, त्यांनी आता महायुतीची अपेक्षा ठेवणं योग्य नव्हे.”
पक्ष स्वतंत्र लढाईस तयार, भाजपसोबत तडजोड करण्याची मानसिकता नाही
भाजपसोबतही रायगडमध्ये युती होणार की नाही, या प्रश्नावर तटकरे यांनी स्पष्ट संकेत देताना सांगितलं की, येथील स्थानिक राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद लक्षात घेता पक्ष स्वतंत्र लढाईस तयार आहे. आगामी निवडणुकांसाठी भाजपसोबत तडजोड करण्याची मानसिकता नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय अंतिम
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी जोरदार तयारी करत असून, पक्षाच्या स्थानिक नेतृत्वालाही तटकरे यांच्या विधानामुळे स्पष्ट दिशा मिळाली आहे. जिल्ह्यातील निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय अंतिम स्वरूपात समोर आला असून महायुतीशिवायची ही लढत आगामी निवडणुकीतील समीकरणे अधिक चुरशीची करणार आहे.
