जेएनएन, मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज मंत्रालयात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मदत पॅकेजची घोषणा केली. त्यानुसार, ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली, त्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच, अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.

दिवाळीपूर्वी अनुदान मिळणार

मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले की, शेतकऱ्यांना जाहीर मदत ही येत्या दिवाळीच्या पूर्वी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यासमोर आलेल्या या मोठ्या संकटात त्याला हातभार लागणार आहे, असं फडणवीस म्हणाले. 

जमिन वाहून गेलेल्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपये मिळणार

राज्य सरकारने मराठवाड्यासह राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार, जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 47 हजार रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी 3 लाख नरेगाच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे, जवळपास हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

पीक नुकसानभरपाई  (Crop Compensation)

    • शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेता आले पाहिजे यासाठी प्रति हेक्टरी 10 हजार रुपये  
    • कोरडवाहू शेतकऱ्यांना 18 हजार रुपये हेक्टरी मदत
    • हंगामी बागायती शेतीनुकसान भरपाई - हेक्टरी 27 हजार रुपये मदत
    • बागायती शेती नुकसान भरपाई - हेक्टरी 32 हजार रुपये मदत  
    • विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना या नुकसानभरपाई व्यतिरिक्त हेक्टरी 17 हजार रुपये मिळणार
    • बागायती शेती ज्यांनी विमा उतरवला असेल त्यांना 50 हजारांहून अधिक मदत मिळेल.

    राज्यात 69 लाख हेक्टरवर नुकसान

    राज्यात 1 कोटी 43 लाख 52 हजार हेक्टर जमिनीवर लागवड झाली होती. त्यापैकी 68 लाख 79 हजार 756 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी मदत करत आहोत, त्यामध्ये 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2059 मंडळांचा समावेश आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

    महत्त्वाचे मुद्दे

    • दुकानदारांच्या नुकसानीसाठी ₹50,000 पर्यंत मदत
    • जनावरांचे नुकसान –प्रति जनावर ₹37,500 पर्यंत मदत, एनडीआरएफची मर्यादा रद्द – प्रत्येक मृत जनावरासाठी सहाय्य  
    • काम करणाऱ्या जनावरांसाठी ₹32,000 प्रति जनावर
    • कुक्कुटपालनासाठी ₹100 प्रति कोंबडी
    • खरडलेल्या जमिनीसाठी ₹47,000/हेक्टर रोख मदत,₹3,00,000/हेक्टर नरेगा सहाय्य, असे एकूण ₹3.5 लाख/हेक्टर
    • 29 जिल्हे, 253 तालुके व 2059 मंडळे यात पिक नुकसानीसाठी मदत, 65 मिमी पावसाची अट रद्द 
    • घरांची पूर्णपणे पडझड झालेल्या ठिकाणी नवीन घरासाठी पूर्ण मदत,डोंगरी भाग: ₹10,00 अतिरिक्त
    • गाळ साचलेल्या विहिरींसाठी ₹30,000 प्रति विहीर
    • ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ₹10,000 कोटी + ₹1,500 कोटी पूरग्रस्त भागांसाठी

    हेही वाचा - Maharashtra Cabinet Meeting: तुकडे बंदी अधिनियमात सुधारणांसह फडणवीस सरकारने घेतले 9 मोठे निर्णय, वाचा सविस्तर