जेएनएन, मुंबई. Maharashtra Budget Session Eknath Shinde Speech: जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया भारतीय संविधानाने घातला. संविधानाने भारतीय संस्कृतीचे आणि देशाचे उज्वल भवितव्य सुनिश्चित केले. अब्जावधी भारतीयांच्या स्वप्नांना बळकटी दिली. गेली 75 वर्ष अविरतपणे देशाला मार्ग दाखवण्याचे काम संविधानाने केले आहे आणि पुढे शतकानुशतके करत राहणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केले आहे.

प्रत्येक जण सन्मानाने जगू शकेल

भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षानिमित्त “भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल” या विषयावर विधानपरिषदेत चर्चा आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक जण सन्मानाने आणि न्यायाने जगू शकेल याची खात्री संविधानाने दिली, असं ते म्हणाले.

संविधान हा केवळ कायदा नाही तर ती लोकशाहीची सनद

स्त्री-पुरुषांना समान अधिकार संविधानाने मिळवून दिला. म्हणूनच आज महिला मुख्यमंत्री, राज्यपाल, न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, राष्ट्रपती अशा उच्चपदांवर पोहोचू शकले आहे. त्यामुळे संविधान हा केवळ कायदा नाही तर ती लोकशाहीची सनद आहे. भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती प्रत्येक भारतीयांने सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे अशी मत शिंदे यांनी व्यक्त केले.

    भारताचा स्वातंत्र्यलढा महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि असंख्य ज्ञात, अज्ञात वीरांच्या नेतृत्वाखाली लढला गेला. त्यातून अखेर देश स्वतंत्र झाला आणि पुढे संविधानापर्यंत पोहोचला, असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.