जेएनएन, मुंबई. "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेबाबत (CM Ladki Bahin scheme) विविध न्युज चॅनल्स, वृत्तपत्रे आणि सोशल मीडिया सारख्या प्रसार माध्यमांवर पसरणाऱ्या चुकीच्या बातम्या व अफवांवर महिलांनी विश्वास ठेवू नये, तसेच ई-केवायसी (e-KYC) संदर्भात कोणत्याही प्रकारची कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांनी जिल्हा कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. 

काय आहे पसरत असलेली अफवा?

सध्या प्रसार माध्यमांमध्ये "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेबाबत लाडक्या बहिणींना ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी अखेरची संधी देण्यात आली आहे, अशी बातमी पसरत आहे. ज्या महिला ऑनलाईन पद्धतीद्वारे किंवा योग्य कागदपत्रांभावी ई-केवायसी (e-KYC) करू शकल्या नाहीत, त्यांना आता ऑनलाईन ऐवजी थेट जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागात कागदपत्रे जमा करण्याची मुभा सरकारने दिली आहे, असा दावा या बातम्यांमधून केला जात आहे. 

प्रशासनाचा खुलासा: कोणतीही नवीन संधी नाही!

प्रसार माध्यमांमध्ये चाललेली ही बातमी पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी असून जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, कार्यालयात कागदपत्रे जमा करून घेण्याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय किंवा परिपत्रक प्राप्त झालेले नाही . या संदर्भातील सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे:

  • नवीन e-KYC साठी संधी नाही: ज्या महिलांनी 31 डिसेंबर 2025 या मुदतीपर्यंत आपल्या अर्जाची ई-केवायसी (e-KYC) केलेली नाही, अशा महिलांसाठी सद्यस्थितीत ई-केवायसी (e-KYC) करण्याची कोणतीही नवीन संधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
  • पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार: ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया यापूर्वीच यशस्वीरीत्या पूर्ण झालेली आहे, अशा पात्र महिलांचे पैसे शासनाकडून टप्प्याटप्प्याने वितरित केले जात आहेत  संबंधित महिलांनी जिल्हा कार्यालयात न येता थेट आपल्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा झाली आहे की नाही, याची खात्री करावी .
  • कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही: ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) पूर्वी चुकली होती, त्यांना ती सुधारण्यासाठी 30एप्रिल 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती. अशा दुरुस्ती केलेल्या महिलांनी देखील कागदपत्रांच्या पडताळणीसाठी महिला व बाल विकास कार्यालयात येण्याची अजिबात आवश्यकता नाही. 

कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन

    चुकीच्या बातम्यांमुळे नंदुरबार येथील जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात महिलांची विनाकारण गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. योजनेचा लाभ महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि पोषण सुधारण्यासाठी थेट बँक खात्यात (Direct Benefit Transfer) जमा केला जात आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता महिलांनी जिल्हा कार्यालयात गर्दी टाळावी आणि सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.