भंडारा. Bhandara Accident News: भंडारा जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मृतांमध्ये तीन लहान बालकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही दुर्घटना नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक येथील भाऊ ढाब्याजवळ घडली. पहाटेच्या वेळी एका ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की पिकअप व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिस आणि बचाव पथकांनाही तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
Bhandara, Maharashtra: Eight people died in a collision between two trucks on the Nagpur-Raipur Highway near Bhau Cha Dhaba in Bhandara district’s Pimpalgaon (Sadak) area early Friday. Several others sustained serious injuries and were hospitalized. Police and rescue teams… pic.twitter.com/kXe8lZRiGT
— IANS (@ians_india) September 11, 2026
या भीषण दुर्घटनेत आठ जणांना जीव गमवावा लागला, तर गंभीर जखमी झालेल्या तीन जणांना तातडीने उपचारासाठी साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. भरधाव वेग, वाहनावरील नियंत्रण सुटणे की अन्य काही कारण, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या अपघातामुळे काही काळ नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.
तीन लहान बालकांसह आठ जणांचा मृत्यू झाल्याने भंडारा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून मृतांची ओळख पटविण्याचे आणि अपघाताच्या कारणांचा सखोल तपास करण्याचे काम सुरू आहे.
