मुंबई - महाराष्ट्र राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट नोंदविण्यात आली आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत राज्यात एकूण 33,002 अपघात झाले असून, त्यामध्ये 14,066 अपघाती मृत्यू झाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत 32,784 अपघातांत 14,185 मृत्यू झाले होते. तुलनात्मक पाहता, अपघातांची संख्या 218 ने (0.66 टक्के) वाढली असली तरी अपघाती मृत्यूंची संख्या 119 ने म्हणजेच 0.83 टक्क्यांनी घटली आहे. मृत्युदरातील ही घट रस्ता सुरक्षा उपाययोजनांचे यश दाखवते.
दरम्यान, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरही अपघाती मृत्यूंमध्ये मोठी घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत या मार्गावर 82 अपघाती मृत्यू झाले होते, तर 2025 मध्ये ही संख्या 61 वर आली आहे. म्हणजेच 21 मृत्यूंनी (26 टक्के) घट झाली आहे. तसेच अपघातांची संख्या 66 वरून 54 इतकी कमी झाली असून, त्यामध्ये 18 टक्के घट नोंदविण्यात आली आहे.
रस्ता सुरक्षा उपायांमुळे काही जिल्ह्यांमध्ये मृत्यूंच्या संख्येत विशेष घट दिसून आली आहे. नागपूर शहरात 21 टक्के, पालघरमध्ये 20 टक्के, अमरावतीत 17 टक्के, पुण्यात 15 टक्के, धुळ्यात 14 टक्के तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 टक्क्यांनी अपघाती मृत्यू कमी झाले आहेत, असे परिवहन विभागाने कळविले आहे.
राज्यातील रस्ता अपघातांची संख्या सन 2030 पर्यंत 50 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट परिवहन विभागाने निश्चित केले असून, त्यासाठी भविष्यात रस्ता सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. याचबरोबर, राज्यातील सर्व वाहनचालक व पादचारी नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहनही परिवहन विभागामार्फत करण्यात आले आहे.
