एजन्सी, वर्धा. Wardha Accident Update: वर्धा जिल्ह्यात एका टँकरची कारला धडक बसल्याने एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. जिल्ह्यातील तारोडा येथे सोमवारी रात्री ही दुर्घटना घडली, असे त्यांनी सांगितले.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कारसमोर रानडुक्कर आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यानंतर गाडी टँकरला धडकली. या अपघातात कारमधील चार प्रवासी - एक पुरुष, त्याची पत्नी आणि दोन मुले - यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - Maharashtra News: औरंगाबाद, उस्मानाबाद, नगरनंतर आता या शहराचं नाव बदलून होणार रत्नपूर, मंत्र्यांची माहिती
रानडुक्कराला वाचवण्याचा प्रयत्न केला अन्
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री प्रशांत वैद्य, पत्नी प्रियंका वैद्य आणि दोन मुलांसह कारने वर्ध्याकडे जात होते. तिरोडा गावाजवळ आल्यानंतर अचानक रस्त्यावर एक रानडुक्कर आडवे आले. भरधाव वेगात असलेल्या कारने या डुक्कराला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये प्रशांत वैद्य यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी समोरून डिझेल टँकर येत होता. कारचा वेग जास्त असल्याने भरधाव वेगाने कार डिझेल टँकरला धडकली.
चौघांचाही मृत्यू
या समोरासमोर झालेल्या कार आणि टँकरच्या जोरदार धडकेमध्ये प्रशांत वैद्य यांच्यासह त्यांची पत्नी आणि 3 वर्षांचा मुलगा, 5 वर्षांच्या मुलीचाही मृत्यू झाला आहे.