जेएनएन, मुंबई. Maharashtra News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यामध्ये 'मूल्यवर्धन 3.0 उपक्रम' राबविण्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
या उपक्रमांतर्गत राज्यातील 1 लाख शाळांतील 5 लाख शिक्षकांमार्फत 1 कोटी विद्यार्थ्यांपर्यंत मूल्याधारित शिक्षण पोहोचविण्यात येणार आहे. शिक्षकांना प्रशिक्षण, उपक्रम पुस्तिका आणि मूल्य आत्मसात करण्यावर भर दिला जाणार आहे. हा देशातील सर्वात मोठा मूल्यशिक्षण उपक्रम ठरणार आहे.
याप्रसंगी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादाजी भुसे, शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनचे संस्थापक शांतीलाल मुथ्था, प्रधान सचिव, शालेय शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) आणि शांतिलाल मुथा फाऊंडेशन (SMF) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शाळांमध्ये राबवला जातो.
मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनबरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 28, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यामध्ये 'मूल्यवर्धन 3.0 उपक्रम' राबविण्याच्या अनुषंगाने… pic.twitter.com/ZTen8Oqppp
उद्देश:
- विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानातील मूल्यांची (उदा. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता) आणि मानवी मूल्यांची (उदा. संवेदनशीलता, सहानुभूती, आदर, प्रामाणिकपणा) रुजवणूक करणे.
- विद्यार्थ्यांना सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम बनवणे.
- विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करण्याची क्षमता आणि लोकशाहीवृत्ती विकसित करणे.
- शिक्षकांसाठी आनंदी आणि सहभागात्मक वर्ग अध्यापन पद्धती विकसित करणे.
स्वरूप:
- हा कार्यक्रम इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
- यामध्ये विविध कृती, खेळ, गोष्टी, गाणी, गट चर्चा आणि विचारप्रवर्तक प्रश्नांचा समावेश असतो.
- प्रत्येक आठवड्याला मूल्यवर्धनसाठी ठराविक तासिका (वेळ) दिला जातो.
- शिक्षकांसाठी मार्गदर्शक पुस्तिका आणि विद्यार्थ्यांसाठी कृती पुस्तिका उपलब्ध केल्या जातात.
हेही वाचा -Ganesh Utsav 2025: यंदा गणेशोत्सवात गावी जायची चिंता मिटणार; मुंबई ते कोकण वॉटर टॅक्सी सुरू होणार