जेएनएन, नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे एका विशेष समारंभात संशोधक आणि लेखक आभास वर्मा यांनी लिहिलेल्या ‘मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स’ (The Maratha War of Independence) या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक भारतीय इतिहासातील एका महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित काळावर प्रकाश टाकते. छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंतर मुघल साम्राज्याविरुद्धच्या लढलेल्या मराठ्यांच्या इतिहासावर केंद्रित आहे.
हे पुस्तक लष्करी लवचिकता, प्रशासकीय सातत्य आणि सांस्कृतिक अस्मितेच्या दृष्टिकोनातून या विस्मृतीत गेलेल्या काळाची पुनर्रचना करते. हा काळ भारतातील पहिला संघटित स्वातंत्र्यसंग्राम म्हणून अधोरेखित करण्यात आला आहे.
नवीन पिढीसमोर खरा, वस्तुस्थितीवर आधारित इतिहास मांडणे ही आपली जबाबदारी
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टीचे राजे होते, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते न्याय, समानता आणि सांस्कृतिक अभिमानावर आधारित प्रशासनाचे एक आदर्श मॉडेल होते. ते खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष होते. सर्व धर्मांना आदर देत आणि कोणावरही अन्याय करत नव्हते. दुर्दैवाने, ब्रिटिश इतिहासकारांनी निवडक कागदपत्रे आणि डायरी लेखनाद्वारे आपला इतिहास विकृत केला. आज, खरी समस्या विचारांचा संघर्ष नसून, त्यांचा अभाव आहे. एका मजबूत आणि आत्मजागरूक भारताच्या निर्मितीसाठी नवीन पिढीसमोर खरा, वस्तुस्थितीवर आधारित इतिहास मांडणे ही आपली जबाबदारी आहे.” असं ते म्हणाले.
📍𝑵𝒆𝒘 𝑫𝒆𝒍𝒉𝒊 | Live from Book launch Program of ‘The Maratha War of Independence’ written by Shri Abhas Verma Ji. https://t.co/Z2GqZBO8oy
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 25, 2025
या कार्यक्रमाला लेखक आणि इतिहासकार उदय माहूरकर, ऑर्गनायझर साप्ताहिकचे संपादक प्रफुल्ल केतकर, गरुड प्रकाशनचे संस्थापक संक्रांत सानु आणि लेखक आभास वर्मा यांच्यासह अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित होते. प्रख्यात विद्वान पद्मश्री प्रा. भारत गुप्त यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवली.
हे पुस्तक संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव दोन महान योद्ध्यांना जिवंत करते
“हा लढा भारताचा पहिला स्वातंत्र्यसंग्राम मानला जाण्याचे कारण म्हणजे, या लढ्याने 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याच्या अंतिम विघटनाची प्रक्रिया सुरू केली आणि मराठा साम्राज्याची स्थापना केली, ज्यामध्ये मराठ्यांनी सुमारे 50 वर्षे दिल्लीतील मुघल सिंहासनावर नियंत्रण ठेवले. हे पुस्तक संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या दोन महान योद्ध्यांना जिवंत करते, ज्यांनी त्यांच्या कौशल्य आणि पराक्रमाने मुघलांना अक्षरशः धुळीस मिळवले आणि औरंगजेबालाही दहशत बसवली, परंतु आजच्या भारताला त्यांची नावे माहीत नाहीत. तसेच, लेखक आभास वर्मा यांनी भारताच्या इतिहासातील एक उज्ज्वल परंतु अज्ञात अध्याय, जो महाराष्ट्रात जवळजवळ तीन शतके दडलेला होता, तो राष्ट्रासमोर मांडण्याचे उत्कृष्ट काम केले आहे.” असं उदय माहूरकर म्हणाले.
हे पुस्तक 1689 ते 1707 या काळातील मराठा प्रतिकाराचे निश्चित वर्णन करते. त्यात छत्रपती राजाराम महाराजांनी 1689 मध्ये रायगडावरून जिंजीला केलेले प्रयाण, किल्ल्याचे रक्षण आणि संताजी व धनाजी यांच्या नेतृत्वाखालील गनिमी मोहिमांचा मागोवा घेण्यात आला आहे. तसंच, या काळातील प्रशासकीय धोरणे, नेतृत्व याच्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. ऐतिहासिक ग्रंथ, मुघल दरबारातील वृत्तपत्रे आणि प्रादेशिक नोंदींचा आधार घेत, हे पुस्तक डोड्डेरी (1696) आणि वागीनगेरा (1706-07) यांसारख्या प्रमुख घटना, मुघल साम्राज्याचा ऱ्हास आणि ताराबाईंच्या नेतृत्वाखालील सांस्कृतिक पुनरुत्थान सादर करते.