मुंबई (एजन्सी) -Raj Thackeray Meet Devendra Fadnavis : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात अटकळांना उधाण आले आहे.
बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे) यांच्यातील पहिल्या संयुक्त निवडणूक लढतीत बुधवारी मानहानीकारक पराभव झाला, कारण पक्षांच्या संयुक्त पॅनेलला निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही.
ठाकरे बंधुंच्या युतीमुळे चर्चेत आलेल्या बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उद्धवसेना व मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाला. 21 जागांपैकी कामगार नेते शशांक राव पॅनलचे 14 तर भाजपचे आ. प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले. ठाकरे बंधूंचा 21-0 ने पराभव झाल्यानंतर भाजपासह महायुतीतील अनेक नेत्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. यातच बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
फडणवीस यांनी दोन्ही पक्षांवर "ठाकरे ब्रँड" भोवती क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकांचे राजकारण करण्याचा आरोप केला होता.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सेना (यूबीटी) आणि मनसे यांच्यात संभाव्य युतीची चर्चा सुरू आहे.
गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात जवळपास पाऊण तास चर्चा झाल्याचे समजते. या भेटीचे निश्चित कारण अद्याप गुलदस्त्यात असले, तरी मुंबईत पावसामुळे झालेली पूरस्थिती, पाऊस आणि मिठी नदीसह विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र बेस्ट निवडणुकीत मनसेसह ठाकरे बंधूंच्या युतीचा दारुण पराभव झाल्यानंतर लगेचच राज ठाकरे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.