जेएनएन, मुंबई. Sugar Rates Hike in Maharashtra: राज्यात साखरेच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसू लागला आहे. घाऊक बाजारात साखरेचे दर 7 हजार 500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचल्याचे चित्र असून, त्याचा थेट परिणाम आता किरकोळ बाजारावर दिसून येत आहे. वाशिम, बुलढाणा आणि सांगलीसह काही जिल्ह्यांत साखरेचा दर तब्बल 80 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. आगामी काळात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटमध्ये साखरेचा कडवटपणा वाढण्याची शक्यता आहे.

साखर हा प्रत्येक घरातील अत्यावश्यक पदार्थ आहे. चहा, दूध, गोड पदार्थांपासून ते सण-उत्सवांतील फराळ आणि मिठाईपर्यंत साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे दरवाढीचा फटका थेट सामान्य ग्राहकांना बसत आहे. विशेष म्हणजे, एका जिल्ह्यातील बाजारपेठेनुसारही साखरेच्या दरात मोठी तफावत दिसून येत आहे. 

मराठवाड्यात साखर 75 रुपयांवर; मिठाई व्यवसायाचे गणित बिघडले

मराठवाड्यात साखरेचे दर 75 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. साखरेच्या दरात झालेली ही वाढ आता मिठाई व्यवसायासाठीही मोठी चिंता ठरत आहे. मिठाई, पेढे, बर्फी, लाडू आणि विविध गोड पदार्थांच्या निर्मितीसाठी साखर हा सर्वाधिक वापरला जाणारा प्रमुख घटक आहे. 

त्यामुळे साखर महागल्याने मिठाई विक्रेत्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यास त्याचा परिणाम अखेर ग्राहकांवर होण्याची शक्यता असून, आगामी काळात मिठाईचे दर वाढू शकतात. सणासुदीचा काळ जवळ येत असताना साखरेची ही दरवाढ मिठाई व्यावसायिकांसह ग्राहकांचीही चिंता वाढवणारी ठरू शकते. 

विदर्भात सर्वाधिक दर; 78 ते 80 रुपये किलो 

    विदर्भातील अनेक जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर 78 ते 80 रुपये प्रति किलो झाले आहेत. बुलढाण्यातही साखर 78 ते 80 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. सांगलीतही 80 रुपये किलोपर्यंत दर पोहोचल्याचे चित्र आहे. 

    विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये साखरेचे दर 60 ते 78 रुपयांच्या दरम्यान आहेत. अमरावतीत 75 रुपये, तर यवतमाळमध्ये 75 ते 78 रुपये प्रति किलो दर आहे. दुसरीकडे गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये साखरेचे दर तुलनेने कमी असून ते सुमारे 60 रुपये प्रति किलो आहेत. 

    मुंबईतही साखर महागली 

    राजधानी मुंबईतही साखरेच्या किमती वाढल्या असून, काही भागांत 60 रुपये तर काही भागांत 65 रुपये प्रति किलो दराने साखर विकली जात आहे. मुंबई महानगरातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये किरकोळ दरात फरक दिसून येत आहे. 

    राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये नाशिक आणि कोल्हापूर येथे 75 रुपये, पुण्यात 72 रुपये, तर परभणी, सातारा, पालघर, लातूर आणि काही भागांत 70 रुपये किलोपर्यंत साखरेचे दर पोहोचले आहेत. 

    जिल्हानिहाय साखरेचे दर 

    राज्यातील विविध जिल्ह्यांतील साखरेचे सध्याचे किरकोळ दर पुढीलप्रमाणे आहेत— 

    • पुणे: 72 रुपये प्रति किलो
    • परभणी: 70 रुपये प्रति किलो
    • सातारा: 70 रुपये प्रति किलो
    • पालघर: 65 ते 70 रुपये प्रति किलो
    • लातूर: 70 रुपये प्रति किलो
    • गोंदिया: 70 रुपये प्रति किलो
    • नागपूर: 68 ते 70 रुपये प्रति किलो
    • भंडारा: 68 ते 70 रुपये प्रति किलो
    • मुंबई: 60 ते 65 रुपये प्रति किलो
    • सांगली: 80 रुपये प्रति किलो
    • वाशिम: 78 ते 80 रुपये प्रति किलो
    • बुलढाणा: 78 ते 80 रुपये प्रति किलो
    • कोल्हापूर: 75 रुपये प्रति किलो
    • अमरावती: 75 रुपये प्रति किलो
    • यवतमाळ: 75 ते 78 रुपये प्रति किलो
    • हिंगोली: 70 ते 75 रुपये प्रति किलो
    • ⁠नाशिक: 75 रुपये प्रति किलो
    • जळगाव: 68 रुपये प्रति किलो
    • अकोला: 65 रुपये प्रति किलो
    • नांदेड: 65 रुपये प्रति किलो
    • वर्धा: 62 ते 64 रुपये प्रति किलो
    • रत्नागिरी: 62 रुपये प्रति किलो
    • चंद्रपूर: 60 रुपये प्रति किलो
    • गडचिरोली: 60 रुपये प्रति किलो

    सर्वसामान्यांचे बजेट बिघडण्याची भीती 

    साखरेच्या वाढत्या दराचा परिणाम केवळ किरकोळ ग्राहकांपुरता मर्यादित राहणार नाही. हॉटेल, चहा टपऱ्या, बेकरी, मिठाई दुकाने आणि खाद्यपदार्थ व्यवसायावरही याचा परिणाम होऊ शकतो. कच्च्या मालाचा खर्च वाढल्यास चहा, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.