जेएनएन, मुंबई: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) पुण्यातील बैठकीत ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या नावावर संमेलनाचे अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब झाली आहे. महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्षांची घोषणा केली. यंदा संमेलनाचं व्यासपीठ हे राजकीय व्यासपीठ होणार नाही याची काळजी घेऊ, वेगवेगळ्या दिवशी राजकीय नेते येतील यासाठी प्रयत्न करू असंही मिलिंद जोशी यांनी म्हटलं आहे.

साताऱ्यामध्ये होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी पुण्यातील साहित्य परिषदेत बैठक आयोजित करण्यात आली होती.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील

'साहित्य संमेलन म्हणजे अभिजात मराठीचा मानबिंदू‌. वैभवशाली मराठीच्या वाटचालीतील समृद्ध दालन आहे. अशा या संमेलनाची शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत सातारा येथे नियोजित 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड ही यथार्थ अशीच आहे. 

पाटील यांनी आपल्या दमदार लेखणीतून वैविध्यपूर्ण आणि कसदार साहित्यकृतीची निर्मिती केली आहे. यामुळे मराठी साहित्यात मोलाची भर घातली गेली आहे. त्यांच्या निवडीमुळे साहित्य संमेलन अध्यक्षांच्या आतापर्यंतच्या मालिकेचाही दिमाख वाढता असाच राहिला आहे. ही बाब मराठी साहित्य क्षेत्रातील होतकरूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या निवडीसाठी साहित्य महामंडळाशी निगडित सर्वांचे मनापासून अभिनंदन केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचे मनापासून अभिनंदन आणि 99 व्या साहित्य संमेलनाचे यजमानपद मिळालेल्या सातारकरांना आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.