जेएनएन, पुणे: जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पुणे येथे महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
सुप्रिया सुळे ही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा संविधान विरोधी आहे. नक्षलवाद संपवल्याचा दावा सरकार करत आहे, तसेच नक्षलवादासाठी कायदे आधीपासूनच अस्तित्वात असताना नवीन कायदा कशासाठी? असा सवाल उपस्थित करत सरकारने हा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली. याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पुणे येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित आंदोलनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सहभागी झाले. सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा संविधान विरोधी आहे. नक्षलवाद संपवल्याचा दावा सरकार करत आहे, तसेच नक्षलवादासाठी कायदे आधीपासूनच… pic.twitter.com/fxqMqEWUx0
— Supriya Sule (@supriya_sule) September 10, 2025
भारतीय संविधानाचा विजय असो, जनसुरक्षा कायदा रद्द करा, अशा घोषणाबाजी करत हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पुण्यात आंदोलनावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला आठवत असेल जेव्हा माननीय उद्धव ठाकरे स्वतः असेंब्लीमध्ये आले होते, त्यावेळेस काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल आम्ही सगळ्यांनी मिळून हा कायदा आणला होता, तेव्हा सगळ्यांनीच याचा विरोध केला होता. मला एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटते की एकीकडे हे सरकार सातत्याने सांगत आहे की, हे या देशातून नक्षलवाद संपवला असे हे केंद्र सरकार नाहीतर राज्यातील सरकार सांगत आहे. तर मग नक्षलवादाच्या विरोधात आधीच आपल्याकडे कायदे असताना आणखी एक कायदा कशासाठी? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सगळ्या समाजात अशी एक चर्चा आहे की हा फक्त की असे कायदे आणून संविधानाच्या विरोधी घेतलेला हा निर्णय आहे. हा देश कोणाच्या मन मर्जी चालणार नाही. हा देश फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि म्हणून या विधेयकाचा महाविकास आघाडी म्हणून विरोध तर आहेच पण जबाबदार नागरिक या नात्याने विरोध करू. आमची विनंती आहे हे विधेयक मागे घेण्यात यावे.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर प्रश्न विचारण्यात आला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गुप्त मतदान असताना मग कसे कळणार की त्यात कोणत्या पक्षाने क्रॉस व्होटिंग केले? वायएसआर काँग्रेस हा पक्ष इंडिया आघाडीत नाही. तुम्हाला कसे माहीत आहे की गुप्त मतदान असताना कोणती मते फुटली हे कसे समजेल? असे आरोप जर केले जात आहेत तर राहुल गांधी जे म्हणतात ते खरेच आहे व्होट चोरी झाली, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.