जेएनएन, मुंबई: यवत येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यवत येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून पोलीस प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
महाराष्ट्र हे शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे राज्य आहे. इथला सामाजिक सलोखा आणि एकात्मता ही आपली ओळख आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न शासन खपवून घेणार नाही असे मत ही पवार यांनी मांडले. दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही. कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षा होईल. राज्याच्या प्रमुखांसह पोलीस प्रशासन आणि जिल्हा यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत," असे पवार यांनी ठामपणे सांगितले.
सर्व नागरिकांनी संयम बाळगावा, शांतता राखावी आणि प्रशासनास सहकार्य करावे. सामाजिक सलोखा टिकवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. महाराष्ट्राची सहिष्णुता आणि सलोख्याची परंपरा जपण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यायला हवे,असे आवाहन अजित पवार यांनी केले.
हेही वाचा:'पतीला नपुंसक म्हणणे ही मानहानी नाही'; घटस्फोटाच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय