नागपूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आपले भाऊ म्हटले आहे आणि त्यांना आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमा दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 1३ वा दिवस असून दिवसेंदिवस त्यांची प्रकती खालावत चालली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने केलेल्या विधानाची राज्यभर चर्चा होत आहे.

इतर मागासवर्गीय (ओबीसी) श्रेणीअंतर्गत मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलन करत आहेत. हैदराबाद आणि सातारा गॅझेट नोंदींची अंमलबजावणी करावी आणि मराठा समाजातील पात्र सदस्यांना कुणबी जात प्रमाणपत्रे वाटप करावीत, अशी मागणीही ते करत आहेत.

नागपूर येथे एका कार्यक्रमाच्या निमित्त पत्रकारांनी अमृता फडणवीस यांना मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाबद्दल विचारले असता अमृता फडणवीस म्हणाल्या, "जरांगे पाटील जी माझे भाऊ आहेत आणि मी त्यांना आमच्या घरी जेवणासाठी येण्याचे आमंत्रण देते."

मराठा आरक्षणासाठी जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी म्हणाले की, राज्यघटना जे काही अनुमती देते ते सरकार देईल परंतु एका समाजाच्या वाट्याचे काढून दुसऱ्याला देणार नाही. आम्ही शक्य ते सर्व करू. आम्ही संवादाची दारे कधीही बंद केली नाहीत. सरकार चर्चेतून मार्ग काढत आहे आणि संपूर्ण प्रक्रिया याच भावनेने पुढे जात आहे, असे ते म्हणाले होते.

अमृता फडणवीस बुधवारी हेही म्हणाल्या की सण सर्वसमावेशक असतात आणि जर एखादी मुस्लिम व्यक्ती उत्सवात सहभागी झाली तर त्यात काही गैर नाही.

    राज्यमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी मुस्लिम व्यक्तींना नवरात्रीच्या कार्यक्रमांपासून दूर ठेवण्याच्या व्हीएचपीच्या (VHP) मागणीला पाठिंबा दिल्यानंतर त्यांची ही टिप्पणी केली होती.

    नवरात्री आणि गरबा हे लोकांना हिंदू धर्माची झलक दाखवण्याचे खूप चांगले मार्ग आहेत, असे सांगून त्यांनी जगाला याच्या वैशिष्ट्याची ओळख करून देण्याचे आवाहन केले.

    11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवात राज्यभरातील 'गरबा' आणि 'दांडिया'च्या ठिकाणी मुस्लिमांना प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा विश्व हिंदू परिषदेने (VHP) गेल्या आठवड्यात केली होती.