एजन्सी. मुंबई: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत आणि विधानपरिषदेत मांडण्यात येणार आहे.
रविवारी विधानभवन, मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा झाली.
या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, शंभुराज देसाई यांच्यासह आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, ॲड. अनिल परब, हेमंत पाटील, श्रीकांत भारतीय, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, डॉ. नितीन राऊत, रणधीर सावरकर, अमिन पटेल उपस्थित होते. विधिमंडळ सचिव (1) जितेंद्र भोळे आणि सचिव (2) विलास आठवले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.
अधिवेशनाच्या कालावधीत 8 मार्च 2025 (शनिवार) रोजी सार्वजनिक सुटी असूनही विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर 13 मार्च 2025 रोजी होळीच्या निमित्ताने कामकाजास विश्रांती दिली जाईल, असे बैठकीत ठरविण्यात आले.
राज्याच्या आर्थिक धोरणांवर महत्त्वपूर्ण निर्णय या अधिवेशनात घेतले जाणार असून आगामी वर्षातील योजनांचे सादरीकरण अर्थसंकल्पाच्या माध्यमातून होणार आहे.