जेएनएन, मुंबई. Pahalgam Terror Attack Update: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे.  या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील, असं आश्वासन राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिलं आहे.

‘हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांना’

केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांना ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा. 1972 साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला. यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना, या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती. भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत. केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमच संपवेल, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी ट्वीट करुन व्यक्त केली आहे.

‘काश्मीरमधून 370 कलम हटवलं’

या हल्ल्याबद्दल वाचताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली. एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की, हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना समोरच्याच्या धर्म विचारला. ही तुमची मुजोरी ? मी अनेकदा माझ्या भाषणात म्हणतो तसं की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ... या हल्लेखोरांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असू देत त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे. केंद्र सरकारने काश्मीरमधून 370 कलम हटवलं. त्यानंतर सगळं जरा सुरळीत होत आहे आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे असं दिसत असताना, जर असा हल्ला झाला तर भविष्यात काश्मीरमध्ये जमीन विकत घेऊन, उद्योगधंदे कोण सुरु करेल ? त्यामुळे केंद्र सरकारने याचा विचार करून ठोस कृती आखावी, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

    ‘सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा’

    हे सगळं करताना केंद्र सरकार कठोर होईल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल, असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

    हेही वाचा - Pahalgam Terror Attack Latest News: पहलगाममध्ये बुलढाण्यातील 5, नागपुरातील 3 पर्यटक अडकले, डोंगरावरुन मारल्या उड्या