जेएनएन, मुंबई. Mumbai Weather Forecast: मुंबई आणि उपनगरात पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांसह ठाणे, मुंब्रा, महापे आणि ऐरोली परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. पावसाचा परिणाम विमान सेवावरही दिसून आला आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला असून, हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सुमारे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक 5 ते 7 मिनिटे उशिराने सुरू आहे. सध्या पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा सुरळीत असल्याची माहिती आहे. पावसाचा परिणाम विमान सेवावरही दिसून आला आहे. स्पाईसजेटने विमान सेवावर परिणाम होत असल्याची माहिती सोसल मीडियावर दिली आहे.
पावसाचा जोर वाढत असल्याने सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता असून, सकाळच्या कार्यालयीन वेळेत मुंबईकरांची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.
हार्बर मार्गावर लोकल उशिराने
मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम हार्बर रेल्वे मार्गावर जाणवत आहे. CSMT-पनवेल, CSMT-वाशी तसेच संबंधित हार्बर मार्गावरील लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.
पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचणे, दृश्यमानता कमी होणे आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव लोकलचा वेग नियंत्रित करणे अशा कारणांमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांना नेहमीपेक्षा अधिक वेळ प्रवासासाठी लागू शकतो.
मध्य रेल्वेची वाहतूकही मंदावली
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरही पावसाचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या लोकल सध्या साधारण 5 ते 7 मिनिटे उशिराने धावत आहेत.
मुंबईच्या मध्य आणि पूर्व उपनगरात पावसाचा जोर वाढत असल्याने कुर्ला, सायन, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे सेवेतील बदल लक्षात घेऊन घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.यापूर्वीही मुसळधार पावसाच्या काळात मध्य रेल्वेच्या विविध मार्गांवर पाणी साचल्याने लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
पश्चिम रेल्वेची सेवा सध्या सुरळीत
मुंबईच्या पश्चिम उपनगरातही पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू असला तरी पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा सध्या सुरळीत सुरू आहे.
मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांनीही रेल्वेचे ताजे अपडेट तपासून प्रवासाचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुंब्रा, महापे, ऐरोलीत मुसळधार पाऊस
मुंबईबरोबरच ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही पावसाने जोर धरला आहे. मुंब्रा, महापे आणि ऐरोली परिसरात गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे.
पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालवावे लागणार आहे. पाणी साचलेल्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबईत पुढील काही तासही पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड परिसरात पुढील काही तासांतही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसाठी सकाळच्या काळात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढल्यास लोकल रेल्वे, रस्ते वाहतूक आणि विमान वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खराब हवामानामुळे मुंबई विमानतळावरील आगमन आणि प्रस्थानाच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा स्पाइसजेटनेही प्रवाशांना दिला आहे.
मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन
पावसाचा जोर पाहता मुंबईकरांनी अत्यावश्यक काम असल्यासच घराबाहेर पडावे, असा सल्ला देण्यात येत आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी रेल्वे स्थानकाकडे निघण्यापूर्वी आपल्या मार्गावरील लोकलची सद्यस्थिती तपासावी. तसेच सखल भाग, नाले, नदीकिनारे आणि पाणी साचलेल्या रस्त्यांवर अनावश्यक जाणे टाळावे. वाहनचालकांनी पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वेगाने वाहन चालवू नये.
