एजन्सी, ठाणे: मुंबई लोकलमध्ये काही दिवसांपासून हत्येचा थरार पाहायला मिळाला होता. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात एका लोकल ट्रेनमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून रात्री उशिरा झालेल्या हाणामारीत तीन प्रवासी जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.
ही घटना अंबरनाथला जाणाऱ्या उपनगरीय ट्रेनच्या सामानाच्या डब्यात घडली, अशी माहिती कल्याण शासकीय रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) वरिष्ठ निरीक्षक अर्चना दुसाने यांनी वृत्तसंस्थेला दिली.
गुरुवारी मध्यरात्री 12.02 वाजता कल्याण जीआरपी नियंत्रण कक्षाला ट्रेनच्या सामानाच्या डब्यात प्रवाशांमध्ये भांडण झाल्याची सूचना मिळाली. त्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकावर ट्रेन येताच जीआरपीचे जवान तिच्याकडे धावले.
तीन जण जखमी
डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान ट्रेन धावत असताना, सीट शेअर करण्यावरून काही प्रवाशांमध्ये जोरदार वाद झाल्याचे तपासात समोर आले, असे दुसाने म्हणाले.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, ज्यात राजू वाघे (19), साहिल खंडारे (19) आणि प्रितेश कानोजिया (31) हे तिघे जण जखमी झाले, असे तिने सांगितले.
जखमींना कल्याण येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यापैकी दोघांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी नंतर मुंबईतील लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल (सायन हॉस्पिटल) मध्ये हलवण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेची पुढील चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
CSMT बाहेर कोयता घेऊन धुडगूस
दरम्यान, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाबाहेर शनिवारी सायंकाळी एका 22 वर्षीय तरुणाने कोयता हातात घेऊन प्रवासी आणि स्वतःच्या पत्नीला धमकावत धुडगूस घातला. गर्दीच्या वेळी पोलिस कॉन्स्टेबलने प्रसंगावधान दाखवत आरोपीला ताब्यात घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. आरोपी वकार अन्वर शेख याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
