जेएनएन, मुंबई: गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे 5 लाख 96 हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातुन एसटीला सुमारे 23 कोटी 77 लाख रुपये उत्पन्न मिळाले, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

आप-आपल्या गावी, वाडया-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक -अधिकिरी अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन प्रताप सरनाईक यांनी केले.

नवा विक्रम प्रस्थापित 

यंदा गणपती उत्सवासाठी एसटीद्वारे कोकण वासियांसाठी 5 हजार जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती.  या बसेस द्वारे 15 हजार 388 फेऱ्यातून 5 लाख 96 हजार प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. अर्थात, एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित आणि अपघात विरहित वाहतूक करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 

23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल 5000 बसेसद्वारे 5 लाख 96 हजार पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. अर्थात, यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले 10 हजार पेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली, ते कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. 

अर्थात, कोकणातील गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसेस ना पर्याय म्हणून चिपळूण, महाड व माणगाव आगारात 100 बसेस तैनात ठेवल्या होत्या.