जेएनएन, मुंबई: रुग्णसेवेचे अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय (KEM Hospital) हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. ज्या विश्वासाने रुग्ण येथे येतात त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

अविरत रुग्णसेवेची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या चरणी मी नतमस्तक होतो, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी समारंभात व्यक्त केली.

सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाच्या 99 वा वर्धापन दिन सोहळा रुग्णालयाच्या प्रांगणात झाला. त्यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार कालिदास कोळंबकर, सुनील शिंदे, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा, केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

KEM Hospital ने घेतलेले रुग्णसेवेचे व्रत अवघड आहे. आजही इथली रुग्णसेवा अहोरात्र चालू आहे. इथल्या डॉक्टरांचे, नर्सेसचे, कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तुम्ही आहात, म्हणून सामान्य मुंबईकर आज जगतो आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

सेवाभाव हा परमभाव आहे, असे आपली संस्कृती सांगते. डॉक्टर देखील वैद्यकीय क्षेत्रात येताना सेवाधर्माची शपथ घेतात. ही शपथ घेऊनच 99 वर्षांपूर्वी हे हॉस्पिटल उभे राहिले. आजही मुंबई आणि आसपासच्या रहिवाशांना आधार देत उभे आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

    KEM Hospital सारखी रुग्णालये ही सर्वसमान्यांसाठी देवदूतासारखी आहेत.  अरुणा शानबाग यांची 41 वर्षे सेवा केईएमच्या कर्मचाऱ्यांनी केली. जगातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचे असे उदाहरण नसेल. KEM Hospital सोबत नाव येते ते जीएस वैद्यकीय महाविद्यालयाचे कितीतरी नामवंत, दिग्गज डॉक्टर या कॉलेजच्या प्रांगणात तयार झाले. इथल्या डॉक्टरांची संशोधकांची कीर्ती जगभर पसरलेली असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी काढले.

    केईएमच्या शताब्दी महोत्सवानिमित्त महानायक अमिताभ बच्चन यांच्याहस्ते फॅटी लिव्हरवरील उपचाराच्या क्लिनीकचे उद्घाटन झाले. ते या आजाराच्या जनजागृतीसाठी ब्रॅण्ड अम्बॅसिडर म्हणून काम करणार आहेत. त्याबद्दल अमिताभ बच्चन यांचे शासनाच्यावतीने आभार मानतो. KEM Hospital चे शताब्दी महोत्सव वर्षे पुढील पिढीसाठी खुप काही देण्यासाठी पायाभरणीचे ठरेल, यात तीळमात्र शंका नाही, असेही ते म्हणाले.