जेएनएन, मुंबई: वरळी येथील एनएससीआय डोम येथे प्रो गोविंदा लीगच्या बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, प्रो गोविंदा लीगच्या माध्यमातून 100 वर्षांची परंपरा असलेला गोविंदा हा खेळ जगभरात पोहोचल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

यंदा आपण सर्वांनी अपघातमुक्त गोविंदा उत्सव साजरा करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा खेळ सुरू असून, या खेळाचा समावेश साहसी क्रीडा प्रकारामध्ये करण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक गोविंदा उपस्थित आहेत. या गोविंदांच्या विमा संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली आहे. यंदाच्या वर्षी 75 हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला आहे. भविष्यात हा खेळ ऑलिंपिकमध्ये सहभागी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा आपण 60 गोविंदांना स्पेनला पाठवतो आहोत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून खेळाला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळेच आपण ऑलिंपिकमध्ये 6 पदक जिंकली आहेत. त्यामध्ये कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याचाही समावेश असल्याचा अभिमान आहे. या स्पर्धांमध्ये एकूण 32 संघ सहभागी झाले होते. त्यापैकी 16 संघांनी आजच्या अंतिम फेरीत आपले कौशल्य सादर केले. यंदाच्या वर्षी सातारा सिंघम यांनी प्रथम क्रमांक पटकावला.