जेएनएन, मुंबई. मुंबईतील वरळी येथे महिला आरक्षण विधेयकाविरोधात झालेल्या आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका महिलेने मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांशी जोरदार वाद घातला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मोर्चे असले की ट्रॅफिक जाम होतो

वरळीमधील त्या मुद्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश म्हणाले की, "असे मोर्चे असले की ट्रॅफिक जाम होतो, लोकांना त्रास होतो, त्यांचाही त्रागा वाटतो हे खरं आहे. आम्हालाही हे मान्य आहे. पण हा मोर्चा महिलांच्या हक्कांसाठी होता. जेव्हा मोठी आंदोलने होतात तेव्हा काय होते, याची कल्पना साऱ्यांनाच आहे. पण त्या महिलेला पोलिसांकडे तक्रार करता आली असती किंवा सौम्य भाषेत राग व्यक्त करता आला असता. पण त्या ज्या भाषेत बोलल्या, बाटली फेकून मारली, ते संयुक्तिक नव्हते. मोर्चा असल्यावर रस्ता तर ब्लॉक होणारच, थोडा त्रास तर होतोच, पण महिलेने वापरलेली भाषा किंवा संताप व्यक्त करण्याची पद्धत योग्य नव्हती," असे महाजन म्हणाले.

 मी त्यांना सॉरीदेखील म्हणालो 

‘फार काही झालं नाही. ट्रॅफिकमुळे त्या महिला वैतागलेल्या होत्या. त्यामुळे त्या ओरडत होत्या. तोच विषय आहे. आम्ही या मोर्चासाठी परवानगी घेतली होती. वाहतूककोंडीमुळे सामान्यांना त्रास झाला याची मला कल्पना आहे. मी त्यांना सॉरीदेखील म्हणालो होते. त्यांनी पोलिसांना रितसर तक्रार द्यायला हवी होती. तुम्ही रस्ते बंद कसे करू शकता, असा जाब त्यांनी मला विचारला. त्यावेळी त्यांची भाषा खूपच वाईट होती.’ असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण:

    महिला विधेयकाच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मंत्री गिरीश महाजन पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना वाहतूक कोंडीमुळे वैतागून ती महिला गाडीतून उतरली आणि थेट आंदोलनाच्या मध्यभागी गेली. तिचा मंत्री आणि कार्यकर्त्यांशी जोरदार वाद झाला. राजकीय सभांमुळे जनतेला होणाऱ्या त्रासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, तिने कठोर भाषा वापरली आणि आंदोलकांवर "इथून चालते व्हा!" असे ओरडत जमावाला पांगण्यास सांगितले. तुमच्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे, असे म्हणताना ती महिला व्हिडिओत दिसत आहे.

    हेही वाचा - Maharashtra Cabinet Decision: कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे 4 मोठे निर्णय