जेएनएन, मुंबई. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,354 घरे व 77 भूखंडांची संगणकीय सोडत काढण्याचा कार्यक्रम आज ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित होते.
म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत ठाणे, ओरोस (सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथे उभारण्यात आलेल्या घरांची आणि भूखंडांची ही सोडत पारदर्शक संगणकीय पद्धतीने काढण्यात आली. या सोडतीसाठी तब्बल 1,84,994 अर्ज प्राप्त झाले असून, सरासरी एका घरासाठी 35 ते 40 अर्ज मिळाले, अशी माहिती त्यांनी दिली.
घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षिततेचा, आत्मसन्मानाचा आणि आनंदाचा पाया आहे. सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्याचे काम म्हाडा पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने करत आहे. आता म्हाडाची घरे उत्कृष्ट दर्जाची, वेळेत पूर्ण होणारी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहेत. म्हाडा ही केवळ गृहनिर्माण संस्था नाही, तर लाखो कुटुंबांच्या आनंदाचे कारण ठरली असल्याचे मत शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
परवडणारी घरे, नोकरदार महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि गिरणी कामगारांसाठी विशेष गृहनिर्माण धोरण आम्ही तयार केले आहे. तसेच आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी परवडणारी भाड्याची घरेही योजनेत समाविष्ट केली असल्याचे शिंदे यांनी यावेळी नमूद केले.
राज्य सरकारच्या नव्या धोरणानुसार पुढील पाच वर्षांत 30 ते 35 लाख नवीन घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ‘प्रत्येकाला घर’ हे स्वप्न आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करत असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी रेवती गायकर आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ उपस्थित होते.
हेही वाचा - Land Survey: जमीन मोजणीचा निपटारा आता केवळ 30 दिवसांत, महसूल विभागाचा मोठा निर्णय