जेएनएन, मुंबई: नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युध्द पातळीवर प्रयत्न करत आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी अशी माहिती दिली.
अजित पवार यांचे आवाहन
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे हीच प्राथमिकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
100 पर्यटक नेपाळमध्ये अडकले
राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 100 पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्ता मार्गे खाजगी वाहनाने परत यायला निघालेले असून ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहचले आहेत.
सर्वाधिक पर्यटक ठाण्यातील
सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत. अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून त्यांच्याशी संपर्क साधून आहे. सर्व पर्यटक सुरक्षित आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
हेल्पलाइन क्रमांक जारी
कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दूतावासाच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावाः
+977-980 860 2881 (व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध)
+977-981 032 6134 (व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध)
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. कृपया अधिकृत माध्यमांद्वारेच माहिती प्राप्त करावी व अफवांपासून दूर राहावे, असे आवाहनही राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र (91- 9321587143 व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध 91- 8657112333 व्हॉट्सअॅप कॉलसाठीही उपलब्ध )